शहरातील संपूर्ण व्यवहार बंद- बॅरिकेड्स लावून बरेच रस्ते रोखले
प्रतिनिधी/ बेळगाव
नागरिकांची वर्दळ नाही… गर्दीचा गोंधळ नाही…. सर्व रस्ते निर्मनुष्य आणि सुनसान… सर्व व्यवहार ठप्प… परिणामी शहरात कमालीची शांतता… शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे बेळगाव शहरात असे चित्र पाहायला मिळाले.
कडक लॉकडाऊनला प्रारंभ झाला आणि शहरातील संपूर्ण व्यवहार बंद झाले. तथापि, सोमवार ते शुक्रवार या दिवसांत सकाळी 6 ते 10 या वेळेत कमालीची गर्दी करणाऱया बेळगावकरांनी लॉकडाऊनचा अर्थ गांभीर्याने घेतला असता तर कडक लॉकडाऊन टाळता आला असता आणि कोरोना नियंत्रणात येण्यास मदत झाली असती.
कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. येणाऱया-जाणाऱया प्रत्येकांची कसून चौकशी करण्यात येत होती. ओळखपत्र दाखवून त्या व्यक्तीचे काम किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज घेऊनच पोलीस त्यांना रस्ता मोकळा करून देत होते. शनिवारच्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते बंद केले. आरपीडी कॉर्नर येथे फक्त एका बाजूने रस्ता खुला करून अन्य सर्व रस्त्यांचा मार्ग रोखला होता.
असे रस्ते बंद झाल्याने तातडीच्या सेवेसाठी जाणाऱया वाहनांची मात्र गैरसोय झाली. अर्थात रुग्णवाहिका, माध्यम प्रतिनिधी यांच्या वाहनांना पोलिसांनी स्वतःहून रस्ता खुला केला. या लॉकडाऊनमध्ये गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पोलीस बंदोबस्त अधिक प्रमाणात दिसून आला. कॅम्प परिसरात पोलिसांनी बाहेर फिरणाऱयांना हटकले व घरी पाठविले. त्या ठिकाणी सर्वत्र पोलिसांनी कडक पहारा ठेवला होता. दूध केंदे आणि औषधाची दुकाने वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद झाल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बेळगावची मुख्य बाजारपेठ म्हणजेच कांदा मार्केट, एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद झाल्याने एक प्रकारची स्तब्धता दिसून आली. सोशल मीडियावर अनेकांनी अशी शांतता वेदनादायी असल्याचे संदेश व्हायरल केले.