पाटगांव/ प्रतिनिधी
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे, मुंबई येथून आलेल्या चाकरमानी बांधवांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कडगांव-पाटगांव परिसरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. छोट्या वाङया-वस्तीवर कोरोना हातपाय पसरत असल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडत आह
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात भुदरगड तालुका कोरोनापासून लांब होता. एप्रील महिन्यात आकुर्डे येथ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतरचे १८ दिवस एकही नवा रुग्ण न आढळल्याने तालुक्यात समाधान होते. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शिथीलता दिल्याने रेड झोन मुंबई व पुणे येथील चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली. मोठ्या प्रमाणात गावाकडे येणाऱ्यां लोकाची तपासणी गारगोटी व कोल्हापूर येथ करण्यात आली असून येणारे अवहाल पॉझीटव्ह येत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील ग्रामदक्षता कमिटीने खबरदारी घेऊन चाकरमान्यांना वेळीच होम व संस्थात्मक क्वारंटाईन केल्याने गावातील धोका टाळला असला तरी गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आलेल्या चाकरमान्यांना ठेवणार कुठे असा प्रश्न दक्षता समिती पुढ उभा आहे. कारण या भागातील बहुतांशी लोक पुणे व मुंबई येथे नोकरीसाठी गेले आहेत. त्यामूळे तेथील रेड झोन परिस्थीतीमुळे यांना गावाकडची ओढ लागली आहे.
लॉकडाऊन नंतर वाढलेल्या या संख्येमुळे जिल्हाबंदी खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणी लपूनछपून प्रवास केला जात आहे. आता तर लॉकडाऊन थोडासा शिथिल करण्यात आल्यानंतर किराणा, दुध, भाजीपाला, औषध घेण्याच्या नावाखाली रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे.
व्यापारी मालवाहू गाड्या घेऊन वाडया वस्त्या गावांमध्ये जाऊन गर्दी गोळा करीत आहेत. बाजारात कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसत नाही. चौथ्या टप्यात असणाऱ्या लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर प्रशासन व पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. शेतीमालाची बाजारपेठेत विक्री करताना शिस्तीचे कठोर पालन, स्वस्त धान्य दुकानातील सुरक्षित वितरण व्यवस्था, गाव बंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी, विनाकारण फिरणार्यांना पोलिसांच्या खास स्टाईलने कठोर पावले उचलणे गरजेची आहेत. या करीता प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क होणार नसेल, तर संपूर्ण तालुका रेड झोन’ होण्यास वेळ लागणार नाही. त्याचबरोबर नागरिकांनीही गांभीर्य लक्षात घेऊन सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
सध्या भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील पाटगाव, शिवडाव, तांबाळे, मडगांव ,पाळ्याचाहुडा व अंतुर्ली बशाचा मोळा, चाफेवाडी गावात रुग्ण सापडल्याने चिंता निर्माण झाली आहे.