दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग : कारलीतून लाखोंचा फायदा
(कृषिसंगत)
कडू कारली झाली लाखमोलाची गोड दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग: कारलीतून लाखोंचा फायदा (24 सीकेडी 1) दानवाड:येथे कारल्याचे पीक दाखविताना अनगौडा पाटील. (24 सीकेडी 2) दानवाड: पाटील यांच्या शेतातील कारली. कारले हे फळभाजी पिकातील महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. हे फळभाजी पीक मानवी जीवनातील आरोग्यासाठी उपायुक्त ठरते. डायबीटीस, शुगर, बीपी रुग्णांसाठी औषध गुणधार्मांसाठी कारले महत्वाचे आहे. या पिकाला मागणी जास्त असून कडू कारले असले तरी औषधी गुणधार्मासाठी नागरिक जास्त प्रमाणात वापरतात. उन्हाळ्यात या फळभाजीला जास्त मागणी असल्याने जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील अनगौडा अप्पनगौडा पाटील या शेतकऱयाने आपल्या 35 गुंठे शेत जमिनीत कारली पिकाचे उत्पादन घेतले आहे. खर्च वजा करता 4 महिन्यात 2 लाखांचा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनगौडा पाटील पुढे म्हणाले, दूधगंगा नदीकाठावर दानवाड येथे 35 गुंठे मळी मिश्रीत जमीन आहे. ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर महापुराच्या पाण्याच्या ओलीवर कोथिंबीर बियाणे पेरणी करुन घेतली. त्यानंतर झालेल्या तुरळक पावसामुळे कोथिंबीरचे पीक जोमात आले. नोव्हेंबर महिन्यात बाजारात कोथिंबीरीला मागणी वाढवी. यावेळी कुरुंदवाड, हुक्केरी, संकेश्वर येथील व्यापाऱयांनी जागेवर येऊन 1 लाख 75 हजार रुपयाची कोथिंबीर खरेदी केली. अडीच महिन्यात 1 लाख 60 हजाराचा नफा झाला.
त्यानंतर त्याच जमिनीत पॉवर ट्रेलरने बेड तयार करुन घेतले. 100 किलो इफको, 100 पोटॅश, 120, 200, 12 व 200 किलो निमोनी पेंड, मायकोन्युटन 50 किलो बोदावर टाकून बेड तयार करण्यात आला. साडेचार फुटी पॉवर ट्रेलरने सरी सोडून घेतले. लागवडीपूर्वी बेसल डोस जमिनीत दिले. यानंतर बोदावर ठिबकद्वारे पाणी देण्यासाठी ड्रीपची पाईप टाकून घेतले. यानंतर जमिनीतून पिकावर किड होवू नये म्हणून मल्चींग पेपर अंथरुन घेतले.
बियणाची निवड व लागवड
उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या कारलीला मागणी जास्त असल्याने तसेच रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्याने व्हीएनआर निसर्ग कारली पिकाची निवड करण्यात आली. 10 डिसेंबर 2019 मध्ये बोदावर रोप लावून घेतले. लागवडीनंतर तिसऱया दिवशी हय़ुमिक ऍसिड व बायोस्टिनचे पाण्यात मिश्रण करुन फिटर पंपाद्वारे आळवणी करुन घेतली. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर बोदावर चार फूट अंतरावर वेल वाढविण्यासाठी बांबू लावण्यात आले. त्यानंतर 10 किलो गायीचे शेण, 10 लिटर गोमुत्र, 2 किलो गुळ, 1 किलो बेसन पिठाचे 200 लिटर पाण्यात मिश्रण केले. 21 दिवसापर्यंत ठेवून जीवामृत द्रावण तयार करुन 6 व्या दिवशी 19ः19ः19, मेघायनॉरजॉव मिश्रण करुन पंपाद्वारे आळवणी करुन घेतली.
25 टन उत्पादनाची शक्यता
पंधारा दिवसानंतर ऍमिस्टार व सिलिगुस्टचे मिश्रण तयार करुन पंपाद्वारे पहिली फवारणी करुन घेतली. पहिल्या फवारणीनंतर आठ दिवसाने कॅलसियम, बोरॉन, स्टागर ब्रियानचे मिश्रण तयार करुन दुसरी पवारणी करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसानी डोमार्क, करमा रोगासाठी निमची फवारणी केली. 45 दिवसानंतर पहिली तोड घेण्यात आली. या तोडीत 200 किलो कारलीचे उत्पादन मिळाले. 22 फेब्रुवारी अखेर चार तोडी पूर्ण झाल्या. आतापर्यंत 4 टनाचे उत्पादन मिळाले आहे. मे अखेरपर्यंत कारली पिकाचे उत्पादन मिळणार आहे. मे अखेरपर्यंत 25 टनापर्यंत उत्पादन निघण्याची शक्यता आहे.
बाजारात 18 ते 20 रुपये दर
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाजारात कारलीस मागणी वाढत आहे. उत्पादित कारलीचे 10 किलोचे बॉक्स तयार करुन जयसिंगपूर व बेळगाव येथील भाजी मार्केटमध्ये एजंटामार्फत विक्री केली. 18 ते 20 रुपये प्रतिकिलो दर मिळाला असून साधारण 25 टनाचे 18 रुपये प्रमाणे 4 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
लागवडीचा खर्च
बियणे पेरणी, बांबू, तार बांधणे, ड्रीप, खते यासह इतर कामासाठी 2 लाखापर्यंत खर्च आला आहे. तसेच तोडणीसाठी व किटकनाशक फवारणीसाठी मे पर्यंत 32 हजाराचा खर्च येणार आहे. 2 लाख 32 हजार खर्च वजा करता निव्वळ 2 लाख 18 हजार रुपयाचा फायदा मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित शिंदे, येडूर