कडोली/ वार्ताहर
कडोली पेठ गल्लीत राबविण्यात येत असलेल्या मास्टरप्लॅनमध्ये विद्युत खांबांचे अतिक्रमण करायचे होते तर जेसीबी फिरवून गोरगरीब जनतेची घरे पाडण्याची काय गरज होती? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन-सव्वा दोन वर्षांपूर्वी येथील प्रमुख पेठ गल्लीतील रस्त्याचे मास्टरप्लॅन राबविण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. गल्लीतील अनेक लोकांचा विरोध डावलून रुंदीकरणाला सुरुवात करण्यात आली. काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली. त्यामुळे संबंधित घरे वगळता सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलीस बंदोबस्तात सर्वसामान्य गरिबांच्या घरांवर जेसीबी फिरविला. या रुंदीकरणात अनेकांना घरे सोडून भाडेतत्त्वावर राहावे लागले. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अद्याप आश्वासनाची पूर्तता झाली नाही.
गटारी म्हणजे जणू भुयारच
या मास्टरप्लॅनमध्ये इंजिनियरनी गटारीची रुपरेषाच बदलून टाकल्याने त्यावेळी नागरिकांतून तीव्र विरोध झाला होता. हा विरोध डावलून गटारींची खोली 7 ते 8 फूट करण्यात आली. गटारीचे पाणी निचरा होण्यासाठी कोणतीच दिशा नाही. त्यामुळे आजही या गटारी तुडूंब भरलेल्या असतात. याचा परिणाम आता जाणवू लागला असून गल्लीतील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.
काम संथगतीने
सदर मास्टरप्लॅनचे काम सुरू होऊन दोन-सव्वा दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांतून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर आठ दहा महिन्यांपूर्वी पथदीप बसविण्यात आले. गटारींचे काम अर्धवट झाले आहे. शिवाय रस्त्याकडेला पेव्हर्स (फुटपाथ) बसविण्याची तरतूद आहे. हे कामही हाती घेण्यात आले नाही. संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
इलेक्ट्रीक खांबांचे अतिक्रमण
सध्या पेठ गल्लीत विद्युत मंडळाने इलेक्ट्रीक खांब बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. परंतु मास्टरप्लॅननुसार डांबरीकरणाच्या रस्त्याकडेला फुटपाथची जागा सोडून इलेक्ट्रीक खांब बसविण्याची गरज होती. पण सदर विद्युत मंडळ डांबरीकरण रस्त्याला लागूनच इलेक्ट्रीक खांबांची उभारणी करीत आहे. तेव्हा रस्त्यावरच इलेक्ट्रीक खांबांचे अतिक्रमण व्हायचे होते तर गोरगरिबांच्या घरांवर जेसीबी फिरवून त्यांना बेघर करण्याची काय गरज होती, असा प्रश्न संतप्त नागरिकांतून विचारला जात आहे. शिवाय इलेक्ट्रीक खांबांची उभारणीही मजबूतपणे केली जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. याबद्दल संबंधित ठेकेदारालाही जाब विचारण्यात आला.
अद्याप नुकसानभरपाई नाही
दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप गल्लीतील नुकसानग्रस्त घर मालकांना नुकसानभरपाई मिळत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना नवीन घरे बांधणे कठीण आहे. येथील कुटुंबीयांनी घरांवर प्लास्टिकचे आवरण घातले आहे. काहीजण दोन वर्षे झाली भाडेतत्त्वावर घर घेऊन दिवस घालवत आहेत. अशा गरीब नागरिकांच्या घरांवर जेसीबी फिरवून त्यांचे मोठे नुकसान केले आहे. गल्लीतील रस्त्याच्या पूर्वेकडील पूर्ण बाजूला दोन वर्षे झाली, मास्टरप्लॅनचे कोणतेही काम झाले नाही. केवळ घरे पाडण्याचे काम करण्यात आले. त्या संबंधित घर मालकांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय मास्टरप्लॅनचे काम कधी पूर्ण होणार, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.