वार्ताहर /कडोली
बुधवारी सायंकाळी कडोली परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱयांची तारांबळ उडाली असून कापलेली भातपिके आणि मळण्या पावसात सापडल्या आहेत. पावसाळय़ात लहरीपणामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कडोलीत अद्याप 80 टक्के भात सुगी थांबली आहे.
गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे कडोली परिसरातील भात सुगीवर मोठा परिणाम झाला आहे. केवळ 10 ते 20 टक्के भात सुगी आटोपली आहे. ती पण अनेकांची कापलेली भातपिके, मळण्या पावसाच्या शिडकाव्यात पार पाडाव्या लागल्या आहेत. कडोली परिसरात अद्याप 80 टक्के भात सुगी व्हायची असून ही सुगी केव्हा पार पाडायची, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. चार दिवसात उघडीप पडेल, अशी आशा बाळगत महिना उलटून गेला तरी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस जाण्याचं नावच घेत नाही. भाताची सराई संपून गेली आहे. भाताची लोंबे जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे भाताच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांत चिंता व्यक्त होत आहे.
बुधवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱयांची भातपिके, मळण्या सापडल्या आहेत. काहींनी तर मळण्यावर ताडपत्री टाकून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हवामान खात्याने दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱयांत भीती निर्माण झाली आहे.