तातडीने पुलाची पुनर्बांधणी करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
प्रतिनिधी / मुंबई:
कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली दृकनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने 6 कोटी रुपये देण्यास शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. पूल कोसळल्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.
21-22 जुलै 2021 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील ( जि. सिंधुदुर्ग) अनेक रस्ते बंद झाले होते. त्यातच कनेडी (सांगवे)-कणकवली दरम्यानच्या नाटळ मल्हारी नदीवरील सुमारे 57 वर्षापूर्वी बांधलेला मल्हार पुलाचा काही भाग कोसळला होता. यामुळे नाटळ, दिगवळे, नरवडेसह दहा गावांचा संपर्क तुटला. या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी विभागास दिले होते. त्यानुसार सहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठविला होता.
कनेडी परिसरातील गावांचा कणकवलीशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी तातडीने करणे आवश्यक असल्याने मंत्री चव्हाण यांनी पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून लगेचच मंजूर केला. यामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे)- कुपवडे-कडावल नारुर-वाडोस -शिवापूर -शिरसिंगे -कलंबिस्त-वेर्ले -सांगेली -धवडकी -दाणोली -बांदा रस्त्यावरील गावांचा संपर्क पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.