वर्दळ रोखण्यासाठी डीवायएसपींकडून जानवली पुलाजवळच तपासणी : विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा
वार्ताहर / कणकवली:
संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावर वाहनांची वाढलेली वर्दळ व शहरी भागात अत्यावश्यक सेवा वगळून दुचाकीवर बंदी असतानाही दुचाकीचा सर्रास होत असलेल्या वापरामुळे नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. शहरात आल्यानंतर आडोशाला दुचाकी लावत शहरात फिरणाऱयांची संख्या लक्षात घेता, बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर व सहकाऱयांनी जानवली पुलाजवळच दुचाकी व अन्य वाहनांची तपासणी केली. त्यामुळे विनाकारण शहरात जाणाऱयांचे व फिरणाऱयांना कारवाईला सामोरे जावे लागले.
मंगळवारी आठवडा बाजार रद्द असतानाही शहरात वर्दळ वाढली होती. त्यामुळे शहरात होणाऱया गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून बुधवारी डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 पासूनच काटेकोर कारवाईला सुरुवात करण्यात आली. शहरात येणाऱया दुचाकी शहराच्या बाहेर जानवली पुलाकडेच अडवून पोलिसांनी त्यांची तपासणी हाती घेतली. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय फिरणाऱयांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
शहराबाहेरही तपासणी!
याबाबत डॉ. कटेकर म्हणाले, लॉकडाऊनमध्ये काही कामांना शिथीलता देण्यात आली, तरी वाढलेली वर्दळ कोरोनाच्यादृष्टीने धोकादायक ठरू शकते. अनेकजण शहरात दुचाकी आडोशाला लावत बाजारपेठेत गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहराबाहेरही दुचाकी व अन्य वाहनांची तपासणी केल्यावर शहरात होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे.
कारवाईत तीव्रता
शहरात पटवर्धन चौकासोबतच अभ्युदय बँकेसमोर महामार्गावर दुपारपर्यंत बॅरिकेटस् लावून पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी करण्यात येत होती. ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट, लायसन, इन्शुरन्स आदी कागदपत्रे नाहीत, अशा व मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱया दुचाकी व अन्य वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. शहरातील 15 पॉईंटला पोलीस कर्मचारी तैनात असून पटवर्धन चौकात पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी कार्यरत होते. जानवली पुलानजीक डॉ. कटेकर यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहभागी झाले होते.