कणकवली:
शहरातील सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग करण्यास परवानगी नसताना देखील बेशिस्तपणे काही वाहनचालक आपल्या गाडय़ा पार्क करून ठेवत आहेत. त्यामुळे हे सर्व्हिसरोड नेमके वाहनचालकांसाठी आहेत की पार्किंगसाठी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहने पार्क करणाऱयांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाई बडगा उचलला जात नसल्याने त्यांचे आयते फावले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरण कामांतर्गत जानवली नदी ते गडनदी पुलापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला. कणकवली शहरात एन्ट्री करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सर्व्हिसरोडची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व्हिसरोडवर काही वाहनचालक बेशिस्तपणे आपली वाहने पार्क करून ठेवतात. हा रोड चिंचोळा बनला असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. सर्व्हिसरोडवर पार्क केलेल्या वाहनांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही आहे. काही वाहनचालक वाहने दिवसभर याठिकाणी पार्क करून जातात.
सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग करण्यास परवानगी नाहीय. तरी देखील वाहने पार्क केली जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून उड्डाणपुलाखाली जागेत वाहने पार्क करण्यासाठी सोय करण्यात आली. मात्र, याठिकाणी वाहने पार्क न करता काही चालक बिनधास्तपणे आपली वाहने सर्व्हिसरोडवर पार्क करून ठेवतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिसरोडवर व उड्डाणपुलाखालील जागेत कोणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा सूचना फलक लावला होता. मात्र, अतिक्रमण करणाऱयांविरुद्ध कोणतेही कारवाई अद्यापही केलेली नाही. बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱयांवरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. wB