माऊली मंदिर परिसरातील जागेचे भूमापनस ग्रामस्थांचा तीव्र विरोध : सरकारी सुटी असताना भूमापन कार्यालय चालू कसे?
वार्ताहर /कणकुंबी
मलप्रभा नदीच्या उगमस्थानावर पुरातन आणि जागृत असलेल्या श्री माऊलीदेवी मंदिर आणि परिसर हा वाद गेल्या काही वर्षापासून निर्माण झालेला असून मंदिर आणि परिसर हा स्वतःची मालकी असल्याचा दावा करणारे बेळगाव येथील रहिवासी युवराज कुर्तकोटी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीचे मोजमाप करण्यासाठी अधिकाऱयांना घेऊन कणकुंबीमध्ये आले असता ग्रामस्थांनी त्या सर्वांना पिटाळून लावल्याची घटना मंगळवारी कणकुंबीमध्ये
घडली.
याबाबतची माहिती अशी की, पांडवकालीन व पुरातन आणि जागृत समजल्या जाणाऱया कणकुंबी येथील श्री माऊली मंदिराच्या जमीन जुमल्या संदर्भात बेळगावचे रहिवासी युवराज कुर्तकोटी आणि माऊली मंदिर विश्वस्त मंडळ म्हणजे ग्रामस्थ असा वाद 1984 पासून सुरू असून कणकुंबी येथील सर्व्हे नंबर 127 मध्ये 16 एकर 25 गुंठे अशी मालमत्ता आहे.सदर मंदिर आणि परिसराचा ताबा मिळविण्यासाठी कुर्तकोटी यांनी मंगळवार दि.19 रोजी बेळगाव आणि खानापूर येथील भूमापन खात्याच्या अधिकारी आणि पोलिसांसमवेत कणकुंबीला दाखल झाले.वास्तविक मंगळवारी सरकारी सुट्टी असताना अधिकारी आलेच कसे? हा अनुत्तरित प्रश्न आहे. सदर बातमी गावात वाऱयासारखी पसरली आणि क्षणार्धात मंदिर कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ मंदिरकडे जमले.
बेळगाव येथील एका खासगी व्यक्तीने गेल्या काही वर्षापासून खोटी कागदपत्रे जमा करून गैरमार्गाने मंदिर आणि परिसर बळकावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, ती व्यक्ती आणि अधिकारी मंदिरकडे आले आहेत, सर्वानी जाब विचारूया, असे म्हणून ग्रामस्थांनी त्या सर्वाना घेराव घातला. या संदर्भात कणकुंबी ग्रामस्थ आणि माऊलीदेवी विश्वस्त मंडळाने तहसीलदार आणि वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार केलेली आहे. असे असताना आपण आज सुट्टीच्या दिवशी आलाच कसे? असा जाब विचारून जमिनीचे मोजमाप करण्यास विरोध केला.
सदर प्रकरण आता चिघळत असून मंगळवार दि. 19 रोजी सरकारी सुट्टी असताना देखील अधिकारी वर्गाला हाताशी धरून युवराज कुर्तकोटी यांनी कोर्टामार्फत आदेश घेऊन आपल्या नावावर असलेल्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी बेळगाव आणि खानापूर येथील भूमापन अधिकाऱयांना घेऊन कणकुंबीत दाखल झाल्याने ग्रामस्थांचा पारा चढला होता. माऊलीदेवी विश्वस्त कमिटीचे पदाधिकारी, महिला व युवकांनी अधिकारी आणि कुर्तकोटी यांना घेराव घातला आणि प्रश्नांचा भडीमार केला.सदर मंदिर सार्वजनिक असून कुर्तकोटी यांनी गैरमार्गाने बळकावण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तेंव्हा सदर जमिनीचे मोजमाप त्वरित थांबवावे, अन्यथा अधिकाऱयांना बांधून घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.त्यामुळे भयभीत झालेल्या अधिकाऱयांनी माघार घेतली.व काढता पाय घेतला. जर पुन्हा माऊली मंदिरासंदर्भात कुर्तकोटी यांनी वेगळय़ा प्रकारचा पवित्रा घेतला तर ग्रामस्थ सहन करणार नाहीत.कुर्तकोटी याना कणकुंबीमध्ये प्रवेशबंदी करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी महिला वर्गाने विशेष पुढाकार घेतला होता.
1997 साली खानापूर म्युनसिफ कोर्टाने दिलेल्या न्यायाप्रमाणे, कुर्तकोटी हे जमिनीचे जरी मालक असले तरी सदर मंदिर हे सार्वजनिक असल्याने मंदिर आणि परिसर विश्वस्त मंडळ कणकुंबी यांच्याकडे राहणार असून दर बारा वर्षांनी होणाऱया यात्राकाळात संपूर्ण परिसर कुर्तकोटी यांनी रिकामी करून देणे बंधनकारक आहे, असा निकाल दिलेला आहे.असे असताना कुर्तकोटी हे पुन्हा पुन्हा गैरमार्गाने प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम गावडे, सचिव लक्ष्मण गावडे व इतर सदस्यांनी दिली. यावेळी कणकुंबी ग्रा.पं. अध्यक्ष रमेश खोरवी, सदस्य, माउलीदेवी विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.