कोरोनाकाळ आपल्या प्रत्येकासाठीच कठीण आहे. प्रत्येकालाच अडचणी, आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अनेकांचं वेतन घटलं आहे. अशा परिस्थितीत कुटुंब चालवायचं तरी कसं असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. मात्र नोकरी गेली म्हणून हातातवर हात धरून बसण्यात आणि नशीबाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. आपण स्वतःच मार्ग शोधायचा असतो. पुण्याच्या अनिता गोसावी यांनीही हेच केलं. कोरोना काळात त्यांची आणि त्यांच्या 25 वर्षांच्या मुलाची नोकरी गेली. त्या स्कूलबस सहाय्यक म्हणून काम करत होत्याम. मात्र शाळाच बंद झाल्याने ही नोकरीही राहिली नाही. त्यांना सुरूवातीपासूनच वाहन चालवण्याची आवड होती. नोकरी करता करता त्यांनी ही आवडही जोपासली. वाहन चालवण्याचे धडे घेतले. हीच आवड त्यांना पुढील आयुष्यात सहाय्यक ठरणार होती.
नोकरी गेल्यानंतर अनिता यांनी भावाकडे मदत मागायची ठरवली. त्यांच्या भावाची रुग्णावाहिका होती. ही रुग्णवाहिका चालवून थोडं उत्पन्न मिळवता येईल का, असा त्यांचा प्रयत्न होता. दरम्यान त्यांच्या भावालाही कोविडने ग्रासलं. मग त्याला मदत म्हणून आणि समाजसेवा म्हणून त्यांनी रुग्णवाहिका चालवण्याचा निर्णय घेतला. अनिता यांनी फक्त पुण्यातच नाही तर लातूर, नाशिकपर्यंत रुग्णवाहिका चालवली. त्यांनी अनेक कोविड रुग्णांची ने आण केली. तसंच मृत रुग्णांना श्मशानापर्यंत येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. हे काम करताना त्यांनी कधीही कुरबुर केली नाही.
सुरूवातीला त्यांचा भाऊ त्यांना हे धोक्याचं काम करू देत नव्हता. मात्र वाहन चालवण्याची आवड असल्यामुळे अनिता यांनी स्वतःहून हे काम स्वीकारलं. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 60 कोरोना रुग्णांची ने आण केली असून 150 मृतदेहांचं वहनही केलं आहे. या सगळ्या काळात त्यांच्यावर मानसिक ताणही आला. मात्र या सगळ्यातून त्यांनी स्वतःला सावरलं. आहे. अनिता यांचा भाऊही कोरोनातून बरा झाला. सप्टेंबर 2020 पासून अनिता हे काम करत आहेत. या काळात आपली मानसिक खणखरता टिकवून ठेवणं त्यांच्यासाठी खूपच आवश्यक होतं. त्यांनी हे आव्हान पेललं. अनिता यांच्यामुळे अनेक कुटुंबाना, रुग्णांना आधार मिळाला आहे. आयुष्यात कधीही निराश व्हायचं नाही हाच धडा त्यांनी घालून दिला आहे.