प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी परिसरात विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी गटारीचे बांधकाम अर्धवट करण्यात आल्याने रहिवाशांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. घरासमोर 5 फूट रूंदीची गटार बांधण्यासाठी चर खोदून ठेवण्यात आल्याने वृद्ध व लहान मुलांना धोकादायक बनले आहे. अर्धवट गटारीचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
शहरात विविध विकास कामे करण्यत येत आहेत. मात्र कोणतेही काम व्यवस्थित आणि वेळेवर होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया कामाच्या ठिकाणी या समस्या अधिक आहेत. प्रत्येक ठिकाणी गटारीचे बांधकाम अर्धवट करून नागरिकांना वेठिस धरण्याचा प्रकार अधिकाऱयांनी चालविला आहे. कणबर्गी येथील तलावाचा विकास करताना येथील रस्ता बंद करून जनावरांना तलावात पाणी पिण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ग्रामस्थांना जनावरांसह आंदोलन छेडण्याची वेळ आली होती. त्यानंतर येथील रस्ता व तलाव मोकळा करण्यात आला. मात्र आता ठिकठिकाणी विकास कामे राबविण्यात येत आहेत. गोकाक रोड शेजारी गटार बांधण्यात येत आहे. पण सदर काम बंद करण्यात आल्याने गटारीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. गटारीची रूंदी 5 फूट असल्याने रहिवाशांना ये-जा करता येत नाही. घराच्या प्रवेशद्वारावरच मोठी चर असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांनी साकव घातले आहेत. पण त्यावरून लहान मुलांना व वृद्धांना अडचणीचे ठरत आहे. गटारीमधून मोठय़ा प्रमाणात सांडपाणी वाहत असते. त्यामुळे लहान मुले गटारीमध्ये पडल्यास वाहुन जाण्याचा धोका आहे. त्यामुळे गटारीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.