आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
गेल्या पंचवीस दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या भात पिकांवर आता किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. उर्वरित पिकेही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कणबर्गी भागातील भात पिकांवर मोठय़ा प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
कणबर्गी परिसरातील सुमारे 500 ते 600 एकर शिवारातील भात पिकांवर करपा रोग पडला आहे. यामुळे हाता तोंडाला आलेली पिके वाया जाणार असल्याच्या भीतीने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचून आधीच शिवारातील पिके कुजून गेली. काही उर्वरित पिकांवर शेतकऱयांची आशा होती. आता उरलेल्या भात पिकाला किडीने ग्रासले असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
कणबर्गी शिवारातील बळ्ळारी नाल्यांच्या पुरामुळे भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कणबर्गी जवळील काही उपनगरातील गटारीचे पाणीही थेट शिवारात गेल्याने या भागातील शेतातील बरेचशे बांध फुटून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जोराचा पाऊस झाला की, त्या नाल्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी शिवारात येते आणि बांध फुटण्याचे प्रकार घडतात ही दरवषीची समस्या असल्याचे शेतकऱयांनी सांगितले आहे.
पिके कुजल्याने मोठे नुकसान
गेल्यावषी महापुरामुळे पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. याची नुकसान भरपाई बऱयाच शेतकऱयांना मिळाली नाही. यंदा सुरुवातीला पावसाने बऱयापैकी साथ दिली होती. मात्र गेल्या 25 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे बळ्ळारी नाल्याचे पाणी शिवारात घुसून बहुतांश पिके कुजून गेली.
कृषी अधिकाऱयांचे या भागाकडे दुर्लक्ष-मनोहर करडी
बळ्ळारी नाला, व्हळेकट व रेल्वेरुळाजवळ आमची एकूण अडीच एकर शेती आहे. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. या शेतीत भात पिके बऱयापैकी होती. बळ्ळारीच्या पुरामुळे भात पिके कुजून गेली. तर शिल्लक राहिलेल्या भात पिकांवर करपा रोग पडला आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱयांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी प्रशासनाने शेतकऱयांच्या नुकसान भरपाईच्यादृष्टीने प्रयत्न करून आम्हाला भरपाई मिळवून द्यावी.
पिकांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याचीच चिंता-मारुती सुंठकर
कणबर्गी परिसरातील गमनतट शिवारात अडीच एकरात भात पेरणी केली होती. त्यावर आता करपा रोग पडला आहे. मशागत, पेरणी, बी बियाणे, रासायनिक खते व भांगलण आदीसाठी खर्च केलेला आहे. जर भात पिकांतून काही उत्पन्न मिळाले नाही तर पिकांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न आम्हा शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.