बुडा अध्यक्षांचे शेतकऱयांना स्पष्टीकरण : विकासकामे राबविण्यापूर्वी भूखंड हस्तांतर करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी योजना राबविण्यास एकीकडे विरोध होत आहे. दुसरीकडे योजना तातडीने राबविण्याची मागणी संमती दिलेल्या शेतकऱयांनी केली आहे. जमिनीचा ताबा घेऊन वर्ष उलटले तरी अद्याप काम सुरू करण्यात आले नसल्याने बुडा अध्यक्षांची भेट शेतकऱयांनी घेतली. त्यामुळे बुडाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर कणबर्गी योजना क्रमांक 61 चे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे स्पष्टीकरण बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी शेतकऱयांना दिले.
भू-संपादन करण्यास आक्षेप घेऊन शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती घेतली आहे. ही योजना रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. या मागणीकरिता बुडा कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्याचा विचार शेतकरी संघटनेने चालविला होता. पण पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला आहे. मात्र, योजना राबविण्यासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवून संमती पत्र दिलेल्या शेतकऱयांनी मंगळवारी बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांची भेट घेऊन योजनेच्या कामकाजाबाबत विचारणा केली. सदर योजनेचे काम वर्षात पूर्ण करून नुकसानभरपाईचे भूखंड देण्यात येतील, असे जमिनीचा ताबा घेताना शेतकऱयांना सांगण्यात आले होते. भूखंडाचा ताबा देताना वर्षाच्या कालावधीची नुकसानभरपाई शेतकऱयांना देण्यात येईल, असे बुडाने लेखी दिले होते. त्यामुळे योजना कधी मार्गी लावणार आणि नुकसानभरपाई कधी देणार? अशी विचारणा यावेळी योजना राबविण्यास संमती दिलेल्या शेतकऱयांनी बुडा अध्यक्षांना केली. योजना तातडीने राबविण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱयांकडून संमती पत्र घेण्यात आले होते. पण योजनेची घोषणा करून चौदा वर्षे झाली तरी अद्याप योजना मार्गी लागली नाही. जमिनीचा ताबा घेऊन दीड वर्ष झाले, पण अद्यापही योजनेच्या कामाला प्रारंभ झाला नाही. जमिनीचा ताबा दिल्यानंतर शेतकऱयांनी शेती पिके घेणे बंद केले असल्याने नुकसान होत असले तरी नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱयांची नुकसानभरपाई कधी देणार, असा प्रश्न केला.
नुकसानभरपाई तातडीने द्यावी
योजनेचे काम तातडीने सुरू करून नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. योजनेच्या अंमलबजावणीकरिता आवश्यक सहकार्य करू, असे शेतकऱयांच्यावतीने बुडा अध्यक्ष आणि आयुक्तांना सांगण्यात आले.
सदर योजनेच्या आराखडय़ाला मंजुरी मिळाली नव्हती. मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या दोन दिवस आधी बी. एस. येडियुराप्पा यांनी योजनेच्या प्रस्तावावर सह्या करून हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता बुडाच्या बैठकीत ठेवण्यात आला. याबाबत चर्चा करून योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात येणार आहे. शेतकऱयांच्या नुकसानभरपाईबाबतही चर्चा करण्यात येईल. योजनेचा प्रस्ताव करताना अनेक अडचणी आल्या असून न्यायालयात वाददेखील सुरू आहे.
पण आता शासनाकडून मंजुरी मिळाल्याने लवकरच जागेचे मोजमाप हाती घेऊन हद्द निश्चितीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे घुळाप्पा होसमनी यांनी सांगितले. योजना राबविण्यास प्रारंभ झाल्यानंतर आराखडय़ानुसार भूखंडाची हद्दनिश्चिती करून विकासकामे राबविण्यात येणार आहेत. पण विकासकामे राबविण्यापूर्वी शेतकऱयांचे भूखंड हस्तांतर केले जातील, असे बुडा आयुक्त दिनेशकुमार जी. टी. यांनी सांगितले. याप्रसंगी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बुडाचे नगर योजना अधिकारी ए. एस. कांबळे, कार्यकारी अभियंते नाईक, साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ यांच्यासह योजना राबविण्यास संमतीपत्र दिलेले कणबर्गी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.