परिसरातील शेतकऱयांचे बुडाला निवेदन : बळीराजाची छळवणूक चालविली असल्याची टिका
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी वसाहत योजनेतील 14 एकरमध्ये 400 घरे आहेत. तसेच काही शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन भू-संपादनास स्थगिती घेतली आहे. तरीदेखील ही योजना राबविण्यासाठी बुडाचे अध्यक्ष प्रयत्नशील आहेत. बेळगाव शहराशी कोणताही संबंध नसताना चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱयांना त्रास देण्याचा प्रकार अध्यक्षांनी चालविला आहे. लँड माफियाला आणि बिल्डर माफियाला सहकार्य करीत असल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
बुडाने कणबर्गी येथील पिकाऊ जमिनीमध्ये वसाहत योजना क्रमांक 61 राबविण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत. 61 क्रमांक योजनेमधील जागेत घरे आहेत. त्याचप्रमाणे अनगोळ येथील योजना क्रमांक 62 मध्ये 1500 हून अधिक घरे असून त्या ठिकाणांचे रस्ते, गटारींचे बांधकाम आणि विद्युत जोडणी व गॅस जोडणी रहिवाशांना देण्यात आली आहे. तरीदेखील ही जमीन वसाहत योजना राबविण्यासाठी संपादीत करण्याचा प्रयत्न बुडाने चालविला आहे. कणबर्गी योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भू-संपादनास स्थगिती घेतली आहे. तरीदेखील भू-संपादन करून योजना राबविण्यासाठी बुडा प्रशासन प्रयत्नशील आहे. याकरिता न्यायालयीन कामकाजासाठी लाखो रुपये खर्ची घालण्यात येत आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया थांबवून योजना रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने बुडा आयुक्त दिनेशकुमार जी. टी. यांना देण्यात आले. यावेळी बुडा अध्यक्षांवर विविध आरोप करून त्यांनी शेतकऱयांची छळवणूक चालविली असल्याची टिका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी व कणबर्गी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.