वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा महामार्गावर गोळवली टप्पा येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱया 3 गाडय़ा पकडण्यात आल्या आहेत. मंगळवारी केलेल्या या कारवाईत 7 बैल व 6 पाडे अशी 13 जनावरे दाटीवाटीने गाडय़ामध्ये कोंबून विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळल्याने पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये तीन वाहनांसह अनिल काळू तावडे (25), सुनील काळू तावडे (27, तुरळ हरेकरवाडी), कृष्णा धोंडू निकम (42), गणेश रमेश निकम (22, कणकवली), प्रसाद रामा निकम (26, फोंडा) यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी पहाटे तुरळवरून सिधुदुर्गकडे कत्तलीसाठी जनावरे घेऊन 3 टेम्पो रवाना होणार असल्याची महिती संगमेश्वर पोलिसांना मिळताच पहाटे 3 वाजता गोळवली टप्पा येथे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे व त्यांचे सहकारी यांनी हे तिन्ही टेम्पो पकडले. यातील बोलेरो पिकअप् (एमएच 08 डब्लू 3430), अशोक लेल्यांड टेम्पो (एमएच 07 पी 3237) व टेम्पो (एम एच 07 पी 3108) यातून 7 बैल व 6 वासरे दाटीवाटीने भरून विनापरवाना कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे दिसले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक उदय कुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत.