पहिल्या टप्प्यात 29 जण शपथबद्ध : बागलकोटमधून कारजोळ तर कारवारमधून हेब्बार यांना मंत्रिपद : 2 दिवसात खातेवाटप
प्रतिनिधी /बेंगळूर
मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी आठवडाभरापासून दिल्ली आणि बेंगळूरमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेले कुतूहल अखेर संपुष्टात आले. अखेर 7 जुन्या मंत्र्यांना वगळून 6 नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी दोनवेळा हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीदौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग तसेच इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बुधवारी सकाळी देखील मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याची कसरत सुरू होती. दुसरीकडे येडियुराप्पा यांना आपले पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना मंत्रिपद मिळवून देण्यात अपयश आले आहे.
विधानसौध येथे 26 जुलै रोजी बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर 27 जुलै रोजी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत हावेरी जिल्हय़ातील शिग्गावचे आमदार बसवराज बोम्माई यांना भाजपचे विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली होती. तर 28 रोजी त्यांनी राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आठवडाभरानंतर त्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात 29 जणांचा समावेश झाला आहे.
राज्य सरकारमध्ये एकूण 34 आमदारांना मंत्रिपदे देता येऊ शकतात. सध्या 29 जणांना मंत्रिपदे देण्यात आली असून 4 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी उफाळून आल्यास आणखी काही जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार भाजप हायकमांडने घेतला आहे. सहा नव्या चेहऱयांना संधी
नव्या मंत्रिमंडळात 6 नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. कारकलचे आमदार सुनीलकुमार, बेंगळूरच्या आर. आर. नगरचे आमदार मुनिरत्न, यलबुर्गाचे आमदार हालप्पा आचार, नवलगुंदचे आमदार शंकर पाटील मुनेनकोप्प, तिपटूरचे बी. सी. नागेश आणि तीर्थहळ्ळी मतदारसंघातील अरग ज्ञानेंद्र यांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील 7 जणांना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये जगदीश शेट्टर, अरविंद लिंबावळी, लक्ष्मण सवदी, एस. सुरेशकुमार, श्रीमंत पाटील, आर. शंकर आणि सी. पी. योगेश्वर यांचा समावेश आहे.
येडियुराप्पा विरोधकांना डावलले
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विरोधकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यास हायकमांडवर दबाव आणलेले आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद आणि सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले गेलेले अरविंद बेल्लद यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना दुसऱया टप्प्यात मंत्रिपद दिले जाऊ शकते.
पक्षांतर करून आलेल्यांपैकी दोघे ‘आऊट’, एक ‘इन’
निजद-काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात येऊन या पक्षाला सत्तेवर आणण्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्यांपैकी दोघांना डावलण्यात आले आहे. श्रीमंत पाटील आणि आर. शंकर यांना मंत्रिपदे मिळालेली नाहीत. पण, या गटातील मुनिरत्न यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर येडियुराप्पा यांचे कट्टर समर्थक एम. पी. रेणुकाचार्य यांना अखेरच्या क्षणी मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी येडियुराप्पांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले.
12 जिल्हय़ांना मंत्रिपद नाही
मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल साधण्यात अपयश आल्याची चर्चा होत आहे. म्हैसूर, गुलबर्गा, रामनगर, कोडगू, रायचूर, हासन, विजापूर, बळ्ळारी, दावणगेरे, कोलार, यादगीर आणि चिक्कमंगळूर या 12 जिल्हय़ांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. तर बेंगळूर शहर जिल्हय़ातील सर्वाधिक 8 आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. बेंगळूर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर बेळगावसह हावेरी, तुमकूर, मंगळूर, बागलकोट, शिमोगा या सहा जिल्हय़ांमधून प्रत्येकी दोघांना मंत्रिपद दिले आहे.
8 लिंगायत आमदारांचा समावेश
जातीय समीकरणाचा विचार करून मंत्रिमंडळात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लिंगायत समुदायातील सर्वाधिक 8 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. वक्कलिग व ओबीसी समुदायातील प्रत्येकी 7, अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 1, ब्राह्मण 2, रेड्डी समुदायातील 1 अशारितीने मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्रिपदच नाही…
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्रिपदामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला होता. या पदासाठी पाच ते सहा जण शर्यतीत होते. मंगळवारी रात्रीपर्यंत दोघांना उपमुख्यमंत्री बनविण्याचा विचार होता. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, अखेरच्या क्षणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सध्या हे पद निर्माण करण्यात आलेले नाही.
शशीकला जोल्ले यांना ‘झिरो ट्राफिक’ व्यवस्था…
अखेरच्या क्षणी मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यात निपाणीच्या आमदार शशीकला जोल्ले यशस्वी ठरल्या आहेत. मंत्रीपद मिळविल्याचे समजताच त्या थेट दिल्लीहून बेंगळूरमध्ये दाखल झाल्या. दिल्लीहून बेंगळूरला त्यांच्या विमानाला अर्धातास विलंब झाला. त्यामुळे त्यांना शपथविधीसाठी विलंब होऊ नये यासाठी देवनहळ्ळी येथील विमानतळापासून राज्य भवनपर्यंत झिरो ट्राफिक व्यवस्था करण्यात आली.
नवनिर्वाचित मंत्री आणि संभाव्य खाती…
- मुख्यमंत्री बसराराज बोम्माई………. अर्थखाते आणि इतर चार खाती
- 1. गोविंद कारजोळ (मुधोळ)………. सार्वजनिक बांधकाम
- 2. बी. श्रीरामुलू (मोळकाल्मुर)…….. समाजकल्याण
- 3. डॉ. अश्वथ नारायण (मल्लेश्वरम).. उच्च शिक्षण, आयटी-बीटी
- 4. आर. अशोक (पद्मनाभनगर)…….. महसूल
- 5. शशिकला जोल्ले (निपाणी)……… महिला-बालकल्याण
- 6. उमेश कत्ती (हुक्केरी)………………. अन्न-नागरी पुरवठा
- 7. व्ही. सोमण्णा (गोविंदराजनगर). गृहनिर्माण
- 8. बी. सी. पाटील (हिरेकेरूर)……… कृषी
- 9. के. एस. ईश्वरप्पा (शिमोगा शहर) ग्रामविकास-पंचायतराज
- 10. शिवराम हेब्बार (यल्लापूर)…… कामगार
- 11. भैरती बसवराज (के. आर. पुरम) नगरविकास
- 12. एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर). सहकार
- 13. डॉ. के. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर) आरोग्य-कुटुंब कल्याण
- 14. मुरुगेश निराणी (बिळगी)……… अवजड उद्योग
- 15. आनंदसिंग (विजयनगर)……….. पर्यटन
- 16. मुनिरत्न (आर. आर. नगर)…….. बेंगळूर शहर विकास
- 17. के. गोपालय्या (महालक्ष्मी लेआऊट) अबकारी
- 18. एस. अंगार (सुळ्य़)…………….. मत्स्योद्योग, बंदरविकास
- 19. सी. सी. पाटील (नरगुंद)………. नगर प्रशासन, वार्ता
- 20. शंकर पाटील मुनेनकोप्प (नवलगुंद) –
- 21. के. सी. नारायणगौडा (के. आर. पेठ) क्रीडा, कौशल्यविकास
- 22. प्रभू चौहान (औराद)……………. पशूसंगोपन
- 23. व्ही. सुनीलकुमार (कारकल)…… प्राथमिक-माध्यमिक शिक्षण
- 24. अरग ज्ञानेंद्र (तीर्थहळ्ळी)……… वन
- 25. हालप्पा आचार (यलबुर्गा)…….. बागायत
- 26. जे. सी. माधुस्वामी (चिक्कनायकनहळ्ळी) लघु पाटबंधारे
- 27. बी. सी. नागेश (तिपटूर)………. कन्नड-सांस्कृतिक
- 28. कोटा श्रीनिवास पुजारी (विधानपरिषद सदस्य) धर्मादाय
- 29. एम.टी.बी. नागराज विधानपरिषद सदस्य परिवहन