आसाममध्ये आतापर्यंत जमिनींच्या 453 मध्यस्थांना अटक – हेमंत शर्मा सरकार ऍक्शन मोडमध्ये
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममध्ये यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने स्वतःच्या संकल्पपत्रात लव्ह जिहादसोबत कथित लँड जिहादचा मुद्दाही सामील केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच प्रचारसभेत याच्या विरोधात कायदा आणणार असल्याचे म्हटले होते. तर आता हेमंत विश्व शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. पोलिसांनी मोहीम राबवून जमिनींच्या मध्यस्थांच्या (दलाल) विरोधात कारवाई केली आहे.
आसाम पोलिसांनी मोहिमेच्या अंतर्गत जमिनीच्या 453 दलालांना पकडले आहे. दलाल राज संपविणे आमचा संकल्प आहे. महसूल कार्यालयात बसून दलाली आणि मध्यस्थांच्या कामाद्वारे सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा गोरखधंना बंद व्हायला हवा. अशाप्रकारचे काम करणाऱयांच्या विरोधात आमचे कार्य सातत्याने सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
आसाममध्ये जमिनींचा व्यवहार आणि दलालीचे काम एक मोठा मुद्दा आहे. मोरीगाव, करीमगंज, नाइगाव, गोलपाडा, हैलाकांडी, धुबरी, बारपेटा समवेत अन्य भागांमध्sय जमिनीद्वारे घुसखोरी किंवा जमिनीच्या खरेदीविक्रीचे काम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. मुख्यमंत्री हेमंत यांनी ‘चाय बेल्ट’मधील हिंदू लोकसंख्या आणि मठांवरील संकटाचा उल्लेख करत आसाम दुसरा काश्मीर ठरणार असल्याची भीती व्यक्त केली होती.
भाजपकडून मुद्दा उपस्थित
राज्यात सत्तारुढ भाजपने कथित लँड जिहादचा मुद्दा लावून धरला आहे. एनआरसी आणि सीएएसोबतच भाजपने लँड जिहादद्वारे शेजारी देश बांगलादेशमधून मुस्लिमांच्या कथित घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. आसाममध्ये मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे राज्याच्या 11 जिल्हय़ांमध्ये हिंदू अल्पसंख्याक ठरल्याचा दावा करण्यात आला होता.
मध्यस्थांच्या मदतीने कट
बांगलादेशी घुसखोर हिंदूंचा छळ करून त्यांना जमीन विकण्यास भाग पाडतात असा आरोप राज्यातील भाजप नेत्यांनी केला होता. या कटात दलालांच्या मदतीने जमिनीवर कब्जा केला जातो. या आरोपांसोबतच भाजपने दलालांच्या संगनमनाते होत असलेला हा खेळ रोखून खऱया मालकाला जमीन पुन्हा मिळवू देणार असल्याचे म्हटले होते.