ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
रविवारी रात्री बिरजू महाराजांची प्रकृती खालावली, अन् ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लखनऊच्या कथ्थक कुटुंबात जन्मलेल्या बिरजू महाराजांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी झाला होता. वडील आच्छान महाराज आणि काका शंभू महाराज हे देशातील प्रसिद्ध कलाकारांपैकी होते. त्यांचे मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी बिरजू महाराज यांच्या खांद्यावर आली. त्यांनी काकांकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. ते महाराष्ट्राला आपला पिता आणि बंगालला माता मानत होते. कारण त्यांच्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली. मात्र, अनेक मानसन्मान आणि नावलौकीक त्यांना महाराष्ट्रात मिळाला.
देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले. याशिवाय सत्यजित राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमातही त्यांनी संगीत दिलं होतं.