कोरोनाचे नियम पाळत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, महिला आघाडी, शिवसेनेतर्फे हिंडलगा येथे आदरांजली
प्रतिनिधी / बेळगाव
कन्नडसक्तीविरोधी आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना यावषीही कोरोनाचे नियम पाळत अभिवादन करण्यात आले. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त करत म. ए. समितीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकासमोर आदरांजली वाहिली.
कर्नाटक सरकारने 1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती लागू केली. त्या कन्नडसक्तीविरोधात सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनीही बेळगावात येवून आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर गोळीबार केला. त्यामध्ये अनेकजण हुतात्मा झाले.
या घटनेला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही येथील मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका म. ए. समिती सरचिटणीस एल. आय. पाटील, एस. एल. चौगुले, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य आर. सी. मोदगेकर, आर. आय. पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलीक, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. महेश बिर्जे, ऍड. शाम पाटील, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, अनिल कोवाडकर, अनिल पाटील, मारुती चौगुले, विलास देवगेकर, संजय पाटील, महादेव कंग्राळकर, रामचंद्र कुदेमानीकर, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, पी. एच. पाटील, पांडुरंग सावंत, चेतक कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव जिल्हा सीमाभाग शिवसेनेच्यावतीने मंगळवारी हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, प्रदीप सुतार, महिपाल चित्ताप्पाचे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
महिला आघाडी
कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्यांना म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी हिंडलगा येथे अभिवादन करण्यात आले. सीमाप्रश्नाची सोडवणूक होऊन महाराष्ट्रात गेल्यानंतरच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी अभिवादन करत सीमालढय़ातील महिलांचे योगदान याविषयी माहिती दिली. माजी महापौर सरिता पाटील यांनी सीमालढय़ात महिलांचा सहभाग कसा वाढविला जाईल, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रूपा नावगेकर व इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.