वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे दोन-तीन तास कोंडीचा सामना
प्रतिनिधी / बेळगाव
कपिलेश्वर उड्डाणपुलावर बुधवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे तब्बल तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तसेच हेमू कलानी चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
बुधवारी दुपारनंतर शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. काही वाहनचालक जागा मिळेल त्या ठिकाणाहून वाहने हाकत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. कपिलेश्वर उड्डाणपूल हा अरुंद असतानाही त्यावरून एकाचवेळी अनेक वाहने हाकून बेशिस्तपणाचा प्रयत्न केला जात होता. याचा फटका इतर वाहनचालकांना बसला. यामुळे पाटील गल्ली, हेमू कलानी चौक, कपिलेश्वर उड्डाणपूल या तिन्ही मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
शनिमंदिर येथे रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक रहिवासीही कंटाळले आहेत. याचा फटका परिसरातील व्यापाऱयांनाही बसू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी रहदारी पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष मार्च महिना असल्याने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी देण्यात आलेले टार्गेट पूर्ण करण्यात रहदारी पोलीस व्यस्त आहेत. त्यामुळे चौकाचौकात हेल्मेट, नो पार्किंग, वाहनांची कागदपत्रे तपासून त्यांना दंड आकारला जात आहे. दंड आकारण्यातच पोलिसांचा वेळ जात असल्याने शहरातील वाहतूक कोंडीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी रहदारी पोलीस दिसून येत नसल्याची तक्रार रहिवाशांकडून केली जात आहे.