दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा : तानाजी गल्ली रेल्वेगेट परिसरातही चक्काजाम
प्रतिनिधी /बेळगाव
आठवडय़ाचा पहिलाच दिवस वाहनचालकांना डोकेदुखीचा ठरला. सोमवारी सायंकाळी कपिलेश्वर उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले. केवळ कपिलेश्वर उड्डाणपूलच नव्हे तर महाद्वार रोड, तानाजी गल्ली रेल्वेगेट येथेही वाहने अडकून पडली होती. इतकी प्रचंड वाहतूक कोंडी होऊनदेखील रहदारी पोलीस नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत होते.
कपिलेश्वर उड्डाणपुलावर सोमवारी वाहनचालकांना ट्रफिक जामचा सामना करावा लागला. शहरातून शहापूरच्या दिशेने जाणाऱया वाहनचालकांना गर्दीमुळे पाटील गल्लीमार्गे जावे लागले. परंतु देशपांडे पेट्रोलपंपपासून तानाजी गल्ली रेल्वेगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने पुन्हा माघारी फिरत जिजामाता चौकातून शहापूरच्या दिशेने जावे लागले.
फोर्ट रोड तसेच पाटील गल्लीत वाहने रस्त्यावर लावल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. परंतु या वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना घरी जाण्यासाठी तासभराची मेहनत घ्यावी लागली.
रहदारी पोलिसांची नेमणूक करा
एरव्ही वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांची फौज उभी असते. परंतु ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्याठिकाणी पोलीसच नसतो. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. कपिलेश्वर उड्डाणपूल व तानाजी रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडी होऊनही पोलीस नसल्याने वाहनचालक संतप्त झाले होते. गर्दीच्या ठिकाणी तरी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी केली जात
होती.