प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गेले काही दिवस बेळगाव शहराला जोडलेला महत्त्वाचा मार्ग कपिलेश्वर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱया वाहनधारकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबवून कोरोनाला थोपविण्यासाठी युद्धपातळील प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी जमावबंदी केली आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.
यामध्ये बेळगाव शहर व शहापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग कपिलेश्वर पूल काही दिवसांपासून बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी लांबचा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. मात्र, सोमवारपासून शहरात लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे येथील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणारे पादचारी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.