चाचपणी करूनच गटार बांधकाम करण्याची गरज : पावसाळय़ात सांडपाणी साचण्याचा धोका
प्रतिनिधी /बेळगाव
कपिलेश्वर तलावाशेजारी गटार लहान असल्याने मोठय़ा पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. सदर सांडपाणी तलावात मिसळत असल्याने गटारीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सदर गटार रेणुका हॉटेलपर्यंत बांधण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गटारीला स्लोप मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला असून, जुन्या गटारीची रूंदी वाढवून नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
शनिमंदिरपासून कपिलेश्वर रोडवरील सांडपाणी महाद्वार रोड येथील नाल्याला सोडण्यात आले आहे. मात्र कपिलेश्वर तलावाजवळ लहान आकाराच्या गटारीमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पावसाचा जोर वाढल्यास गटारी ओव्हरफ्लो होवून सांडपाणी रस्त्यावर येते. आणि रस्त्यावरील सांडपाणी जुन्या कपिलेश्वर तलावात मिसळते. एरव्ही हा तलाव रिकामी ठेवला जातो. तसेच तलावामध्ये जमा होणारे पाणी वेळोवेळी काढले जाते. मात्र यंदा गणेशोत्सवादरम्यान झालेल्या पावसामुळे गटारी ओव्हरफ्लो होवून सांडपाणी तलावामध्ये मिसळले होते. गणेशोत्सवामुळे दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन जुन्या कपिलेश्वर तलावात करण्यात आले होते. नवव्या दिवशीच्या गणेश विसर्जनावेळी सायंकाळच्यावेळी जोरदार पाऊस झाला.
गटार बांधकाम करून सांडपाणी थेट नाल्यात सोडणार
सांडपाणी तलावात मिसळल्याने विसर्जन कसे करायचे? असा मुद्दा उपस्थित झाला. गणेश विसर्जन करणाऱया भाविकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने विसर्जन करण्याचे टाळले. तसेच दोन दिवसांवर असलेल्या 11 दिवसांचे विसर्जन कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. सांडपाणी मिसळल्याने शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात आला. वेळोवेळी तक्रारी करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केले होते. ऐन गणेशोत्सव काळातच पावसाचे पाणी तलावात मिसळल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. विसर्जनासाठी संपूर्ण तलावातील पाणी काढून नवीन पाणी भरण्यात आले. पण या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेत महापालिकेने तलावाच्या शेजारी गटारीचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे. येथील गटार बांधकाम करून सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येणार आहे. याकरीता महाद्वार रोड कॉर्नर ते रेणुका हॉटेलपर्यंत थेट गटार बांधण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
गटार बांधण्याकरीता दोन दिवसापूर्वी चर खोदण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेणुका हॉटेलपर्यंत मोठय़ा आकाराच्या पाईप घालण्यात आल्या आहेत. या पाईपपर्यंत गटारीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याठिकाणी गटार बांधकाम केल्यास स्लोप मिळणार नाही. त्यामुळे पावसाळय़ात सांडपाणी पुन्हा तलावात मिसळण्याचा धोका आहे.
गटारीची रूंदी 3 ऐवजी 5 फूट करा
कपिलेश्वर रोडवरील रेल्वे फाटकापासून महाद्वार रोड कॉर्नरपर्यंत 3 फूट आकाराची गटार बांधण्यात आली आहे. त्यापुढील गटार लहान आकाराची असून, काही ठिकाणी बुजली आहे. ही गटार नाल्याला जोडण्यात आली आहे. जर महाद्वार रोड कॉर्नरपासून नाल्यापर्यंतच्या गटारीची रूंदी 5 फूट करून नव्याने बांधकाम करण्यात आल्यास सांडपाण्याच्या समस्येचे निवारण होवू शकते. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी याची पाहणी करून नंतरच गटारीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.