प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे शहरवासियांना सुरळीत पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊनदेखील गळती निवारणाकडे दुर्लक्ष झाले आहे. ताशिलदार गल्ली-कपिलेश्वर रोड कॉर्नरवर 15 दिवसांपासून गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे बारगळले असून शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या, विद्युतपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठय़ात येणाऱया अडचणी अशा विविध कारणांमुळे पाणीपुरवठा नियोजन कोलमडले आहे. काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांना गळती लागल्याने व पंपिंग स्टेशनमधील पॅनेलबोर्ड खराब झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. मात्र याचदरम्यान ताशिलदार गल्ली कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी पाणी वाया जात असून दुरुस्तीबाबत तक्रारी करूनही एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावरून वाहात असून नागरिकांना सुरळीत पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. शहरवासीय पाणीटंचाईला सामोरे जात असतानादेखील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याचा मुबलक साठा असतानादेखील पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अयोग्य नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. ताशिलदार गल्ली येथील जलवाहिनीची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.