नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी सोमवारी डिनरचं आयोजन केलं होतं. १५ पक्षांचे सुमारे ४५ नेते आणि खासदार सोमवारी डिनरच्या निमित्ताने एकत्र आले होते. कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त हे डिनरचं आयोजन केलं असलं तरी यावेळी चर्चा मात्र मोदी सरकारविरोधात सुरु होती. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधील बदलांसंबंधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले. गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडलं तरच पक्ष मजबूत करणं शक्य असल्याचंही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या चर्चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सहभाग घेत मत व्यक्त केलं.
राहुल गांधी सोमवारी दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत आणि या दरम्यान विरोधक डिनरच्या निमित्ताने एकत्र आले. डिनर पार्टीचं आयोजन करणारे कपिल सिब्बल हे G23 चे सदस्य आहेत जे काँग्रेस नेतृत्वावर असमाधानी असल्याचे सांगितले जातं. त्यांच्या व्यतिरिक्त, G23 चे अनेक मुख्य सदस्य देखील या डिनरला उपस्थित होते. ज्यात गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंग हुडा, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर आणि संदीप दीक्षित यांची नावे महत्त्वाची आहेत.
यावेळी कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करत कशाप्रकारे त्यांच्या काळात प्रत्येत संस्था नष्ट केली जात आहे याचा उल्लेख केला. एक दृष्टीकोन समोर ठेवून विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी ते म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी जेव्हा काँग्रेस मजबूत असते तेव्हा विरोधकही मजबूत असतात असतात सांगत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय केलं जात आहे अशी विचारणा केली.