तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाचे सावट असताना देखील सोलापुरच्या ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील धार्मिक विधी सुरळीत पार पाडण्यासाठी गेली महिनाभर सुरू असलेली मानकर्यांची लगबग थांबली. सोलापुरात शनिवारी परंपरेप्रमाणे कप्पडकळी विधीने महायात्रेची सांगता झाली. सकाळी 9 वाजता हिरेहब्बू वाड्यातून सिध्दय्या स्वामी हे श्री सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंड शुक्रवार पेठेतील देशमुखांच्या वाड्यात घेऊन आले. त्यावेळी होमहवनचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू व धनेश हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत सुदेश देशमुख, सोमशेखर देशमुख, सुधीर देशमुख यांनी योगदंडाची पूजा केली. त्यानंतर हिरेहब्बू यांची पादपूजा होऊन देशमुखांकडून हिरेहब्बूंना कपड्यांचा आहेर दिला. आहेरानंतर आशीर्वादरुपात हिरेहब्बू यांनी खोबरे, खारीक व लिंबू देशमुख परिवाराला दिले. देशमुख वाड्यातून परतल्यानंतर सलग पाच दिवस धार्मिक विधीत परिधान केलेले मानाचे भगव्या रंगाचे वस्त्र उतरवित कप्पडकळी या धार्मिक विधींचा समारोप करण्यात आला. उपस्थित मानकरी व भाविकांना खारीकाचा प्रसाद देऊन यात्रेचा सांगता समारोप करण्यात आला.