वार्ताहर / कबनूर
राज्य शासनाने उसाच्या एफआरपीचे परिपत्रक माघारी घ्यावे व शेतकऱ्यांना एक रकमी रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी आज कबनूर ग्रामपंचायत चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. तसेच कोल्हापूर येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
शासनाने उसाच्या एफआरपीचे दोन तुकड्यात द्यावे असे परिपत्रक जारी केली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे जाहीर निषेध करून शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी रक्कम मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना कबनूर व गावातील शेतकरी येथील ग्रामपंचायत चौकात एकत्रित येऊन शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्याला दिवसा दहा तास विद्युत पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मिलिंद कोले, महादेव पाटील, सुभाष सुतार, सुजन शिरगुप्पे, देवराज पाटील, पपू पाटील, अजित चौगुले, बाळासाहेब कामत, महेश पाटील, बाळासाहेब मगदूम, सचिन वाकडे कर, धनंजय कोले, सुनील पाटील, अशोक केटकाळे , कल्लू मगदूम, महावीर लिगाडे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.