प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील हलसवडे येथील कायम हक्काने मिळालेल्या जमिनीस कब्जेदार म्हणून नोंद करावी, या मागणीसाठी हलसवडे येथील दलित समाजाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
मौजे हलसवडे येथे रिसन 156 ब, 151, 152।1 ही जमीन वाटप होण्यापुर्वी पासून दलितांची कुळहक्क वहिवाट होती. कुळहक्काचा कब्जा कायम केल्याने पुन्हा कब्जापट्टी सोडलेली नाही. सातबारा उतार्यावर त्याची नोंद आवश्यक होती. परंतु त्याची कार्यवाही झालेली नाही. 8 अ उतार्याला देखील 1961 ते 2016 पर्यंत समस्त हरिजन अशी नोंद आहे. नोंदीसाठी 2013 पासून पाठपुरावा सुरू आहे. पण त्रुटी काढून अर्ज फेटाळला आहे. दोन वर्षांपासून परिसरातून विमानतळासाठी लागणारा दगड उत्खनन सुरू आहे. त्याचा त्रास होत आहे. तरी कब्जेदार म्हणून दलित समाजातील 70 जणांची नोंद व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी हलसवडे येथील दलित समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, अशी माहिती म्हादू कांबळे, बाळासो कांबळे यांनी दिली.