बिहारमध्ये 20 वर्षांनी भाजप ठरला ‘मोठा भाऊ’ : नितीश यांचा प्रभाव कमी होणे निश्चित
बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवून रालोआचे तिसऱयांदा सरकार स्थापन होणे आता जवळपास निश्चित आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांचे महत्त्व कमी होणार आहे. भाजपला बिहारमध्ये 2015 च्या निवडणुकीपेक्षाही अधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपने 72 जागा मिळवून राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक जागा लढवूनही भाजपला केवळ 53 जागांवर यश मिळाले होते. संजदला यंदाच्या निवडणुकीत सुमारे 20 हून अधिक जागांचे नुकसान झाले आहे. संजदला केवळ 43 जागांवर विजय संपादित करता आला आहे.
निवडणुकीच्या निकालामुळे बिहार आणि रालोआत बरेच काही बदलणार आहे. बिहारमध्ये भाजप तसेच संजदची भूमिका आणि स्थान दोन्ही बदलणार आहे. संजद आतापर्यंत बिहारमध्ये भाजपचा मोठा भाऊ म्हणून वावरत होता. दोन्ही पक्षांच्या जागावाटपातही हेच दिसून येत होते. आम्ही बिहारचे राजकारण करू, भाजपने केंद्राचे राजकारण करावे, असे नितीश कुमार म्हणत आले आहेत. मोठय़ा आणि छोटय़ा भावाच्या भूमिकेत बदल एक-दोन वर्षांमध्ये नव्हे तर 20 वर्षांमध्ये झाला आहे. काही निवडणुकांमध्ये भाजपला संजदहून अधिक जागाही मिळाल्या आहेत. तरीही संजद आणि नितीशने भाजपला छोटा भाऊच मानले आहे.