चिखलीतील पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू
प्रशांत चव्हाण/ गुहागर
नियती कधी भरभरुन देते तर कधी क्रुरपणे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करते. कोरोनामुळे होणारे मृत्यू हसते-खेळते संसारच उद्ध्वस्त करत आहेत. गुहागर तालुक्यातील चिखली येथील वडील-मुलाचा एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबच निराधार झाले आहे.
चिखली बौध्दवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व चिखली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश महादेव गमरे व त्यांचा विवाहित मुलगा सुरज याला कोरोनाची लागण झाल्याने हे दोघेही कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. मात्र, सकाळी वडिलांचा तर सायंकाळी मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश गमरे यांचा चिखली कारुळ फाटय़ावर गेली 20 वर्षे रिक्षा व्यवसाय होता. चिखली ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते. गावाच्या विकासासाठी ते नेहमी धडपड करायचे. सुरेश गमरे यांचा वृध्द आई, पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा त्यांचा हसताखेळता परिवार होता. सुरज नोकरीनिमित्त दुबईला होता. गेल्यावर्षी कोरोना आपत्तीपासून तो गावीच होता व 6 महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
कुटुंबाचा सारा भार वडील व मुलग्यावर असतानाच नियतीने घातलेला हा घाला चिखली गावाला धक्का देणारा ठरला आहे. गावाच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सुरेश गमरे यांचे योगदान मोलाचे ठरले, मात्र कोरोनाने त्यांचा बळी गेला. वडील गेले आणि त्या मागोमाग कमावता मुलगाही या कुटुंबाने गमावला. घरात अन्य कोणीही कमावते नसल्याने या कुटुंबासमोर अंधार पसरला आहे.
पाणी योजनेतून स्मृति जपण्याची मागणी
चिखली गावातील काही वाडय़ांना पाण्याची मोठी झळ बसते. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणी योजना राबवण्याचे सुरेश गमरे यांचे स्वप्न होते. त्यांच्या प्रयत्नांनी पाणी योजना मार्गीही लागली. त्यांचे स्मरण म्हणून पाणी योजनेच्या विहीर किंवा साठवण टाकीला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ संदीप मांडवकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.