‘चीनमधील (सत्ताधारी) कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भारताच्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्यांचा सहभाग’ या वृत्ताने गेला काही काळ गाजला आहे. सध्या लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला असून तो गेले सव्वा वर्ष सुरू आहे. चीनने भारताच्या सीमाभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारताने चीनला तसे करण्यापासून रोखले. यातून गलवान येथे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले. या संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले तर चीनचेही 40 हून अधिक सैनिक मृत झाले. (चीनने आपला आकडा भारतापेक्षा कमी असल्याचा दावा केला असला तरी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी तो 40 च्या पुढे असल्याचे स्पष्ट पेले आहे.) या अजूनही सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध होते की काय, अशी परिस्थिती होती. अशा वातावरणात भारतातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या सदस्यांनी चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत समाविष्ट व्हावे, ही बाब प्रत्येक देशभक्त नागरिकाला संताप आणणारीच आहे. तथापि, (केरळचा अपवाद वगळता) बव्हंशी जनतेशी संपर्कच तुटलेल्या कम्युनिस्ट नेत्यांना लोकांच्या संतापाची काही तमा नसणे, याचेही आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती नाही. या पक्षांनी, तसेच त्यांच्या नेत्यांनी चीनशी आपली निष्ठा दाखविणे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. कम्युनिस्ट पक्षांच्या मनोभूमिकेचे धागेदोरे आपल्याला या पक्षाच्या इतिहासात भरपूर सापडतात. या इतिहासावर धावता दृष्टीक्षेप करताना असे दिसते की 1964 पूर्वी देशात भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा एकसंध पक्ष होता. 1959 मध्ये चीनने भारताच्या लडाख भागात तसेच अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याची योजना आखली. 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी झालेल्या संघर्षात भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 10 सैनिक चीनकडून मारले गेले. तथापि, तत्कालीन नेहरू सरकार जागे झाले नाही. या दुर्लक्षाचे पर्यवसान 1962 च्या भारत-चीन युद्धात झाले. या युद्धात भारताचा पराभव झाला. त्याबरोबरच पूर्वी एकसंध असणाऱया कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली. साधारणतः 100 च्या आसपास नेते या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. ही फूट 1964 मध्ये पडली होती. 1962 च्या भारत-चीन युद्धापूर्वी चीनने तिबेट घशात घातला. तसेच तेथील मूळ रहिवासी असणाऱया तिबेटी जनतेवर निर्घृण अत्याचार केले. तथापि, काही जणांचा अपवाद वगळता भारतातील कम्युनिस्ट नेत्यांनी चीनच्या या आक्रमकपणाचा निषेध केला नाही. उलट चीनने तिबेटच्या जनतेला भांडवलवादी आणि धार्मिक शक्तींच्या विळख्यातून सोडविण्यासाठी तिबेटमध्ये सेना पाठविली आहे, अशी साळसूद भूमिका घेतली. चीनने भारतावर हल्ला केल्यानंतरही पूर्वीच्या एकसंध कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांनी चीनचा धिक्कार न करता उलट चीनचे हे आक्रमणच नसून समाजवादी क्रांतीसाठी उचललेले पाऊल आहे. भारतातील भांडवलवादी शक्तींचा बीमोड करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत, अशीच भूमिका मांडली होती असे दिसून येते. पुढे याच अतिरेकी चीनवादामुळे एकसंध कम्युनिस्ट पक्षाचेही दोन तुकडे झाले. चीनने भारतावर आक्रमण केले असूनही चीनचीच तळी उचलून धरण्याच्या या भूमिकेमुळे कम्युनिस्ट पक्ष तसेच एकंदरच कम्युनिस्ट चळवळच भारतीय जनतेच्या मनातून उतरली. त्यापूर्वी भारताच्या बऱयाच राज्यांमध्ये नाव घेण्यासारखे स्थान असणाऱया या पक्षांचे प्रभावक्षेत्र झपाटय़ाने घसरले. यापैकी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा सर्वात मोठा असणारा पक्ष केवळ त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि केरळ या तीनच राज्यांमध्ये प्रभावशाली होता. आता तर यापैकी त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल ही राज्येही त्याच्या हातून निसटली आहेत. केवळ केरळमध्ये तो सत्तेवर आहे. राष्ट्रीय राजकारणातही या पक्षाची मोठी घसरण झाली आहे.इतर कम्युनिस्ट पक्षांचीही हीच गत आहे. एकेकाळी 70 च्या वर खासदार लोकसभेत असणाऱया या पक्षाचे आता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत, आणि तेही अन्य पक्षांच्या साहाय्याने निवडून आले आहेत. या प्रचंड घसरणीला या पक्षाचा काळाप्रमाणे न बदलण्याचा हट्टाग्रह जितका कारणीभूत आहे, तितकाच त्याचा चीनवादही आहे, हे त्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. बहुसंख्य भारतीय जनता देशाच्या सार्वभौमत्वावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवते. भारताचा दुःस्वास करणाऱया देशांना सहानुभूती देणारे पक्ष या जनतेला आवडत नाहीत, हे तिने अनेकदा विविध निवडणुकांमधून स्पष्ट केले आहे. भारतीय जनतेची ही मानसिकता समजून न घेणाऱया पक्षांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असत नाही, हे देखील अनेकदा दिसून आले आहे. तरीही कम्युनिस्ट पक्ष आपल्या जुन्याच वळणाने जाणार असतील तर ते काळाची पावले ओळखू शकत नाहीत, असेच म्हणावे लागेल. अशा स्थितीत ते प्रगती तर करू शकणार नाहीतच, पण त्यांची घसरण अशीच सुरू राहील. हा प्रश्न केवळ या पक्षांचे काही सदस्य चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत समाविष्ट झाले एवढाच नाही. चीन आणि भारताचे संबंध सुरळीत असते आणि भारताच्या भूभागावर चीनने दावा केला नसता तर या नेत्यांच्या या वर्तनाला कोणी आक्षेप घेतलाही नसता. तथापि, चीनची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे. भारताचे लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हे प्रदेश, तसेच नेपाळ आणि भूतान हे देश ही तिबेटची ‘पाच बोटे’ असून ती चीनच्याच मालकीची आहेत, असे माओ त्से तुंग यांचे धोरण होते. ते चीनने अद्यापही सोडलेले नाही. त्यामुळे ही ‘पाच बोटे’ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तो देश नेहमी करत राहणार हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतात कोणत्याही पक्षाचे राज्य असले तरी चीन त्याचा आक्रमक विस्तारवाद सोडणार नाही, हे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे चीनसमोर बोटचेपेपणा केला तर तो शांत बसेल, ही समजूत भाबडेपणाची आहे. या उपद्रवी शेजाऱयाशी शिष्टाचार म्हणून गोड बोलणे वेगळे आणि त्याच्या कहय़ात जाणे वेगळे. हा फरक भारतातील प्रत्येक पक्षाने समजून घेतला पाहिजे.
Previous Articleहॉकीत गतवैभवाला उजाळा, कुस्तीत पुन्हा रौप्य बहार!
Next Article देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटींवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.