मोन्सेरात कुटुंबियांकडून निसर्गाचा ऱहास : ’काँक्रीटचे जंगल’ बनविण्याचा घाट
प्रतिनिधी /पणजी
राजधानीतील मिरामार-दोनापावल मार्गावरील करंजाळे येथे वनखात्याच्या जमिनीतील सुरूच्या बनात बुलडोझर फिरवून शेकडो झाडांचा संहार करण्याच्या प्रकारावर आम आदमी पार्टीचे नेते वाल्मिकी नाईक आणि सेसिल रॉड्रिग्ज यांनी संताप व्यक्त केला आहे.
करंजाळे येथे रस्त्यालगत सुरूच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या कृत्याचा निषेध करताना ते बोलत होते. या कृत्यासाठी त्यांनी मोन्सेरात कुटुंबियांनाच जबाबदार धरले असून ते स्वतःला पणजी आणि ताळगावचे ’राजा, राणी आणि राजकुमार’ समजत आहेत का? कायद्याचे उल्लंघन करून संरक्षित आणि नो-डेव्हलपमेंट झोनमधून रस्ता बनविण्याची परवानगी कोणी दिली? हा विनाश कोणी आणि कुणाच्या फायद्यासाठी केला? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
केंद्राच्या योजनेअंतर्गत निसर्गसंपन्न अशा मिरामार-करंजाळे किनाऱयाला बफर झोनचे संरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. मात्र मोन्सेरात कुटुंब येथे काँक्रिट जंगल तयार करत आहेत, असा आरोप वाल्मिकी यांनी केला आहे.
या भागात नव्यानेच सुरू झालेल्या तारांकित हॉटेलच्या फायद्यासाठी सदर वनसंहार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यात तथ्य असेल तर तो गंभीर गुन्हा ठरणार असून त्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे. गोवा हे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण वारसा म्हणून ओळखले जाणारे राज्य आहे. त्याचा आनंद घेण्यासाठीच पर्यटक येतात. मात्र केवळ स्वार्थासाठी मोन्सेरात कुटुंब सोन्याची अंडी देणाऱया कोंबडय़ा मारत आहे, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला आहे.
दरम्यान, पणजीचे स्थान विशेषतः चक्रीवादळ, त्सुनामी आणि समुद्राच्या पातळीतील वाढीसाठी असुरक्षित बनले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील अशा या भागाच्या विनाशासाठी संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नाईक आणि रॉड्रिग्ज यांनी केली आहे. अन्यथा कायदेशीर लढा देण्याचा इशारा दिला आहे.