अनंत चतुर्थीला रास्ता रोको आंदोलन होणार
प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारी महिन्यापासून करंजे येथील रस्त्यालगतच्या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही वेळेस पाणी पुरवठा होत नाही. बिले मात्र अव्वाच्या सव्वा येत आहेत. फक्त एकदाच पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी याच अनुषंगाने अभियंता द्विग्विजय गाढवे यांच्याकडून आढावा घेतला. त्यावेळी दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता खोदावा लागणार आहे. त्यास बांधकामकडून परवानगी मिळत नसल्याचे कारण त्यांनी सांगितल्याने हा प्रश्न आता चिघळणार असून करंजेतील नागरिक अनंत चतुर्थीच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
करंजे पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने पाणी पुरवठा सीता हादगे यांनी त्यांच्या केबीनमध्ये पाणी पुरवठा विभागाचे अभियंता द्विग्विजय गाढवे, सुपरव्हायझर संदीप सावंत यांच्याकडून त्या कामाचा आढावा घेतला. गाढवे यांनी त्या ठिकाणचे काम करायचे असेल तर रस्ता खोदावा लागणार आहे. त्याकरता परवानगी घ्यावी लागणार आहे. ती परवानगी लगेच मिळणार नाही. रस्ता खोदल्याशिवाय दुरस्ती करता येणार नाही, अशा समस्या त्यांनी सांगितले. दरम्यान, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी हे सर्व ऐकून घेवून नगराध्यक्षा माधवी कदम यांना ही बाब कळवली आहे. मात्र, त्या ठिकाणच्या दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने नागरिकांनी दिलेल्या मुदतीत काम होणार नाही. त्यामुळे नागरिक पालिकेकडून होत असलेल्या विलंबामुळे हा प्रश्न चिघणार आहे. नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
ठेकेदाराकडून घातले जातेय खतपाणी
नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही होणे गरजेचे असताना नागरिकांनी विनंती करुनही कार्यवाही होत नसल्याने पालिका प्रशासनावर सर्वसामान्य नागरिक चिडून आहेत. असे असताना काही ठेकेदारांकडून स्वतःच्या फायद्यासाठी काम कसे उशीरा होईल हे पाहिले जाते. याही कामात खतपाणी ठेकेदाराकडून मिळत असल्याची चर्चा सुरु आहे.