खासदार उदयनराजेंचा घणाघात, नाकर्त्यांना मताचा दणका द्या
प्रतिनिधी /सातारा
शेतकरी मेडिकल ग्रुप इंन्शुरन्स योजना जुलै-21 पासून लागु केल्याचे, एप्रिल 21 मध्ये सातारा जिल्हा बँकेने जाहिर केले. सोसायटी थकबाकी नसावी अशी मुख्य अट लादली. सभासदांनी विम्याचा लाभ मिळेल म्हणून सोनं-नाणं गहाणवट करुन, थकबाक्या भरल्या. जिल्हय़ातील सोसायटी सचिवांनी रात्रीचा दिवस करुन बँकेने मागविलेली माहितीसुध्दा मुदतीत दिली. परंतु जाहिर केलेल्या ग्रुप इंन्शुरन्सचा प्रिमियमच करंटय़ा पदाधिकाऱयांनी भरला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून, हजारो सभासद थकबाकी भरुन, दवाखाना बाबींवर खर्च करीत आहेत. सभासदाला नागवा करण्याचंच पाप संबंधितांनी केले आहे. अस्मानी संकटाचा शेतकरी सामना करीत आहेच पण सुलतानी संकट बॅँकेच्या कोणा नाकर्त्यांमुळे ओढावले आहे. त्यांना आता मताचा दणका द्या, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
मोठा गाजावाजा करीत, माहितीपत्रके, हजारो भित्तीपत्रके लावून, मा.स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोसह, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकरी मेडिकल ग्रुप इंन्शुरन्स योजना, एप्रिल 2021 मध्ये जाहिर केली. त्याचा हप्ता इंन्शुरन्स कंपनीला बॅँकेच्या स्वनिधीतुन भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 31 जुलै 2021 पर्यंत सेवा सोसायटीचे सर्व प्रकारच्या घेतलेल्या कर्जाची थकबाकी नसावी अशी अट घातली व जे पात्र ठरतील त्यांच्या व त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या एका व्यक्तींच्या दवाखाना खर्चाची हमी घेतल्याचे जाहिर केले होते असे उदयनराजेंनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.
संचालक मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार 31 जुलै 2021 रोजी थकबाकी नसलेल्या खातेदारांची माहिती बॅँकेने सेवा सोसायटय़ांकडून मागविली. कोरोनाचा काळ होता. कोणाला कधी कोरोना आणि अन्य दुर्धर आजार झाल्यास आधीच समस्यांच्या गर्तेत असलेल्या शेतकरी सभासदांनी, आजारपणाच्या भितीने, किडूक-मिडुक जोडून, दागदागिनी गहाणवट किंवा प्रसंगी मोडून, सेवा सोसायटय़ांची थकबाकी निरंक केली. या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या सुमारे 253000 व त्यांच्यावर अवलंबुन असलेली एक व्यक्ती अशा सुमारे 500000 व्यक्तींची पात्र यादी तयार करुन, सेवा सोसायटय़ांच्या सचिवांनी रात्रंदिवस बसून, खातेदारांची माहिती बॅँकेला मुदतीत सादर केली.
तरी सुध्दा बॅँकेने विमा कंपनीला ग्रुप इंन्शुरन्सचा प्रिमियमच भरला नाही. यशवंत विचारांना त्यांनी एकप्रकारे तिलांजलीच दिली. त्यामुळे आज कित्येक सभासदांनी ज्या कोणावर आजारपण ओढावले असेल त्यांनी स्वतःच स्वतः निभावून नेले आहे. योजनेची घोषणा करायची, अमिष दाखवायचे, परंतु कार्यवाही शुन्य करायची हे कसले यशवंत विचार आहेत. पातळयंत्री व्यक्तेच्या अकार्यक्षमतेमुळे सभासदांचे मात्र लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सभासदांच्या तळतळाटाचा जाब संबंधितांना विचारायची वेळ आली आहे. जे काही आहे ते इथेच फेडायचे आहे. हे पाप कुठे फेडणार असा खरमरीत सवाल देखिल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱयांसाठी मेडिक्लेम योजना सन 2010 सालापासून सुरु करण्यात आली होती. तथापि पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना लागु झाल्याने, बॅँकेने स्वतःची विमा योजना 2016 च्या दरम्यान बंद केली. ती जर योजना सुरु असती तर कोरोनाच्या महामारीत सापडलेल्या अनेक सभासदांना त्याचा आर्थिक टेकू मिळाला असता. केंद्राच्या या दोन विमा योजनांबाबत सभासदांनी वार्षिक प्रिमियम रुपये 12 आणि रुपये 330 विहित कागदपत्रासोबत भरणेबाबत सभासदांचे कोणतेही प्रबोधन अथवा जाणिव जागृती बँकेमार्फत केली गेली नाही यासारखे दुसरे दुर्देव ते कोणते असही खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.