प्रतिनिधी/पणजी
कोणतीही करवाढ नसलेला तसेच 10 हजार रुपये शिल्लक दाखविणारा वर्ष 2022-23 साठी सुमारे 101.67 कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी पणजी महापालिकेने संमत केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात एकुण 37.87 टक्के महसुली वाढ दाखविण्यात आली आहे.
विरोधकांकडून काही मुद्यांना जोरदार आक्षेप, हरकती तर समर्थकांकडून आलेल्या सूचना, शिफारसी मान्य करत सर्वांनुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयुक्त आग्नेल फर्नांडीस, उपमहापौर संजीव नाईक यांच्यासह बहुतेक सर्व नगरसेवक उपस्थित होते.
अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सूचविण्यात आलेली नसली तरीही महसूल वाढविण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर थकबाकी वसुली करणे, दुर्लक्षामुळे वाया जाणारा महसूल गोळा करणे, आवश्यक तेथे परवाना फी मध्ये वाढ करणे यासारखे निर्णय घेण्यात आले.
मनपाच्या महसुलात सध्या पॅसिनोंकडून सर्वाधिक योगदान मिळत आहे. गतवर्षी पॅसिनोंकडून 1.4 कोटी महसूल गोळा करण्यात आला. त्याबद्दल संबंधित अधिकाऱयांचे अभिनंदन करण्यात आले. पॅसिनोंच्या फी मध्ये अजूनही वाढ केल्यास मनपाला अधिक मिळकत होऊ शकते, अशी सूचना मांडण्यात आली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग असलेली वाहने उभी करण्यात आली असून त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी पार्किंगच्या जागा अडविण्यात आल्या आहेत. भरीस त्यांच्याकडून कोणताही महसूलही मिळत नाही, असे नगरसेवक उदय मडकईकर यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे तत्काळ कारवाई करून ती होर्डिंग्ज हटवावी अशी मागणी त्यांनी केली.
सुरेंद्र फुर्तादो यांनी महसूल गळतीकडे लक्ष वेधताना सुमारे 15.35 लाख रुपये अद्याप वसूल होणे बाकी असल्याचे दाखवून दिले. अशावेळी यंदाचा सुमारे 84.48 कोटी अंदाजित महसूल कसा गोळा करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक वसंत आगशीकर आणि प्रसाद आमोणकर यांनी मनपाकडून काही प्रकारात अकारण होणाऱया उधळपट्टीकडे लक्ष वेधले. पाणी पुरवठय़ासाठी वार्षिक 1 कोटी खर्च होत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर मनपाचे स्वतःचे सुमारे 600 कामगार असताना गटारे उपसण्यावर 50 लाख खर्च करण्याचा हेतू काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या मालकीची उद्याने आहेत. त्यांच्या देखरेखीकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्यामुळे बरेच साहित्य मोडकळीस, नादुरुस्त झालेले आहे. या उद्यानांच्या देखभालीसाठी मनपाकडे सुमारे 20 कोटी निधी शिल्लक आहे. त्याचा वापर करून या उद्यानांना नवा साज चढवावा, असे आमोणकर यांनी सूचविले. शेवटी सर्वांनुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.