काश्मीरमधील चकमकीत दोन भारतीय जवान हुतात्मा : नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी धुमश्चक्री
श्रीनगर / वृत्तसंस्था
नववर्षाच्या पहाटे जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ात नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) झालेल्या जोरदार धुमश्चक्रीत दोन भारतीय जवानांना वीरमरण आले. नायक संदिप रघुनाथ सावंत ( वय 29) आणि रायफलमॅन अर्जुन थापा मगर (वय 25) अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. संदिप सावंत हे सातारा जिल्हय़ातील कराडमधील मुंढे गावचे रहिवासी आहेत. कोल्हापूर जिल्हय़ातील गडहिंग्लज-उंबरवाडी येथील जवान जोतिबा चौगुले हे हुतात्मा झाल्यानंतर पंधरवडय़ातच आणखी एका महाराष्ट्राच्या सुपुत्राने प्राण गमावल्याने नववर्षाच्या प्रारंभीच राज्यावर शोककळा पसरली आहे.
31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री रात्री नौशेरा सेक्टरमधील जंगलात घुसखोरांशी चकमक उडाली. घुसखोरांना पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) भारतात घुसवण्याचा प्रयत्न करीत असताना पहाटेच्या वेळी खारी थरिया भागातील जंगलात अडवले गेले होते. त्यानंतर अन्यत्र एका ठिकाणाहून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर चकमक उडाल्याचे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. काही दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटेच्या सुमारास केला. यावेळी भारतीय सैन्याच्या जवानांनी जोरदार सशस्त्र दहशतवाद्यांचा सामना केला. मात्र, दोन जवानांना जीव गमवावा लागला, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले.
सशस्त्र दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षात सुरुवातीला भारतीय सैन्य दलातील दोन सैनिक गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, असे लष्कराकडून सांगण्यात आले. हुतात्मा झालेल्यांपैकी संदिप सावंत हे महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ातील मुंढे-कराड येथील रहिवासी आहे. तर, अर्जुन मगर (वय 25) हे नेपाळमधील गोरखा जिल्हय़ातील रिप गावातले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आहेत. दोघेही जवान अत्यंत शूर, प्रेरणादायी आणि प्रामाणिक सैनिक होते. सर्वोच्च बलिदान आणि कर्तव्यनि÷ा यासाठी राष्ट्र नेहमीच त्यांचे ऋणी राहील, असे लेफ्टनंट कर्नल आनंद म्हणाले.
परिसरात शोधमोहीम सुरूच
संशयित दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर सैन्य दलाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सन 2018 मध्ये दहशतवादविरोधी कारवाईत 83 सुरक्षा कर्मचाऱयांना आपला जीव गमवावा लागला होता, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
2011 मध्ये सैन्यदलात
संदिप सावंत हुतात्मा झाल्याचे वृत्त येताच मुंढे गावासह कराड तालुक्यावर शोककळा पसरली. संदिप यांचा जन्म मुंढे येथे 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. सप्टेंबर 2011 मध्ये सैन्यदलात भरती झाले होते.
तीन महिन्यांची कन्या पोरकी…
त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सावंत, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता आणि मुलगी रिया असा परिवार आहे. तीन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसांपूर्वी ते गावी आले होते. मुलीचा नामकरण सोहळा झाल्यावर ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
संदीपच्या आठवणीने मित्र परिवार सुन्न
संदिप नुकताच गावी आल्याने त्याची मित्रांशी भेट झाली होती. मित्रांशी गप्पा मारताना संदिपने सैन्यदलातील अनेक किस्से सांगितले होते. नुकताच भेटून गेलेला संदिप हुतात्मा झाल्याचे वृत्त आल्याने मित्रांना हुंदका आवरता येत नव्हता. दहशतवाद्यांच्या कारवाया आणि पाकिस्तानच्या घुसखोरांविषयी संतप्त भावना व्यक्त होत होत्या.