1 एप्रिलपासून चोवीस तास पाणी योजना सुरू करणार
कराड / प्रतिनिधी :
कराड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी 11 जानेवारीपासून शहरातील दोन वेळा होणारा पाणीपुरवठा बंद करुन दिवसात एक वेळ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जनक्षोभापुढे त्यांनी माघार घेतली असून रोज दोन वेळा प्रत्येकी 45 मिनिटे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान 1 एप्रिल 2022 पासून चोवीस तास पाणी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात 11 पासून रोज सकाळी एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मुख्याधिकारी डाके यांनी जाहीर केला. यावरून कालपासून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज सकाळी शहरातील चौकाचौकात या निर्णयाला विरोध करणारे फलक अज्ञात नागरिकांनी झळकावले होते. तर सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, जयंत बेडेकर भारत जाधव राहुल चव्हाण, अख्तर आंबेकरी, नवाज सुतार व गब्बर ग्रुप व दक्ष कराडकर यातील काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी प्रश्न हा प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण घेतलेला एक वेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय हा मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यानंतर बरीच चर्चा होऊन मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन निर्णय मागे घेतला. त्याऐवजी सकाळी पंचेचाळीस मिनिटे व संध्याकाळी पंचेचाळीस मिनिटं असा दोन वेळा पाणीपुरवठा करून 25 टक्के खर्चामध्ये कपात करण्याबाबत चर्चा झाली. त्या प्रमाणे पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान, चोवीस तास पाणी योजना 1 एप्रिलपासून चोवीस तास पाणी योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.