कर्नाटकात औषध आणण्यासाठी निघालेल्या कारला अज्ञात वाहनाची धडक
प्रतिनिधी/ कराड
पॅरालिस झालेल्या महिलेला औषध घेण्यासाठी हडपसरवरून नागरमुनोळी येथे घेऊन निघालेल्या कुटुंबाच्या कारला गुरूवारी पहाटे भीषण अपघात झाला. जखिणवाडी (ता. कराड) येथे महामार्गावर अनोळखी भरधाव वाहनाने कारला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अनोळखी वाहनाच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून या अपघाताने हडपसरच्या वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय 49, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय 51, रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अश्विनी श्रीहरी वाघमारे (वय 45), रागिनी श्रीहरी वाघमारे (वय 21, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय 38, रा. गंगानगर, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी फुलचंद चतुर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील अपघातग्रस्त कुटुंबातील महिलेला पॅरालिसचा झटका आला होता. त्यांना कर्नाटकातील नागरमुनोळी येथील औषध घेण्यासाठी काहीजण मारुती सुझुकी कारने हडपसरवरून बुधवारी रात्री निघाले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्यांची कार कराड तालुक्यातील जखिणवाडी गावच्या हद्दीत आली. मळाईदेवी पतसंस्थेसमोर महामार्गावर असताना त्यांच्या कारला समोरून डाव्या बाजूने भरधाव आलेल्या अनोळखी वाहनाने जोराची धडक दिली. धडक एवढी जोरात होती की कार दोनवेळा उलटल्याचे पोलिसांनी सांगितले. कारचा क्षणार्धात चक्काचूर झाला. अचानक झालेल्या अपघाताने कारमधील प्रवाशांनी प्रचंड आरडाओरडा केला. कारमधील बापूसाहेब कांबळे व श्रीहरी वाघमारे यांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे, फुलचंद चतुर हे गंभीर जखमी झाले. कारला धडक देऊन अनोळखी वाहन घटनास्थळावरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. परिसरातील ग्रामस्थ मोठा आवाज झाल्याने घटनास्थळाकडे धावले. कारमध्ये अडकलेले जखमी अवस्थेत तिघेजण मदतीसाठी टाहो फोडत होते. त्यांच्या ओरडण्याने उपस्थितही सुन्न झाले. कराड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांबळे, अपघात विभागाचे हवालदार खलील इनामदार, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात पाठवले. घटनास्थळी प्रवाशांचे कपडे, खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्यांसह इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघाताची नोंद कराड शहर पोलिसांत झाली आहे.