मित्राकडे जातो सांगून पुन्हा घरी परतले नाहीत
प्रतिनिधी/ सातारा
कराड तालुक्यात तारुखचे रहिवाशी पोलीस निरीक्षक संग्राम शिवाजीराव ताटे (वय 37) हे जालना जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. गेल्या सहा दिवसांपासून ते मित्राकडे जातो असे सांगून दोन्ही मोबाईल घरात ठेऊन गेले ते अद्याप परत आले नाहीत. ते बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली असून जालना पोलिसासह सातारा पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत.
संग्राम ताटे हे सुरूवातीला सांगली पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांची बदली यवतमाळ येथे झाली. खात्याअंतर्गत परीक्षा देऊन ते सहायक पोलीस निरीक्षक पर्यंत पोहोचले आहेत. सध्या त्यांची नेमणूक जालना येथे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. त्याच दिवशी म्हणजे दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ते घरातून निघून गेले. मित्राकडे जातो, असे सांगून ते गेले. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने पत्नीने त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांचे दोन्ही मोबाईल घरातच सापडले. त्यामुळे पत्नीला शंका आली. पत्नीने तत्काळ जालना येथील पोलीस ठाण्यात जाऊन पती घरी आले नसल्याचे सांगितले. जालना पोलिसांनी मिसिंग दाखल करून तपासाला सुरूवात केली. मात्र गेल्या सहा दिवसांपासून त्यांचा थांगपत्ता लागत नाही. जालना पोलिसांसह सातारा पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. तारूख येथे त्यांची आई, भाऊ, आजी राहत असून हे सर्वजण चिंतेत आहेत. त्यांचे वडील प्राध्यापक होते. त्यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.