प्रतिनिधी/ कराड
घरोघरी कचरा संकलन करून नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱया घंटागाडय़ांचे रोजचे वेळापत्रक विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून 18 पैकी 2 गाडय़ा बंद आहेत. काही नादुरूस्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकूणच कचरा संकलन विस्कळीत होऊन शहरात जागोजागी कचरा दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेताना 2017-18 साली 18 घंटागाडय़ांची खरेदी केली होती. या घंटागाडय़ांना चार कप्पे असून ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक आणि घातक कचरा अशा प्रकारे वर्गीकरण करून कचरा गोळा करण्यात येतो. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पालिकेने कचरा संकलनावर भर दिला होता. नागरिकांमध्ये जागृतीही केली होती. त्यामुळे 100 टक्के कचरा संकलन होऊ लागले. शहर स्वच्छ दिसू लागले होते.
पालिकेने कचरा संकलनाचा ठेकदार काही महिन्यांपूर्वी बदलला आहे. गाडय़ांची खरेदी करून चार वर्षे उलटली आहेत. त्यामुळे या गाडय़ा नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत 18 कचरा गाडय़ा असून त्यापैकी 2 बंद आहेत. गाडय़ांच्या तक्रारी वाढल्याने अनेक प्रभागात गाडय़ा उशिरा जात असून काही प्रभागात एखाद्या गाडीच जात नसल्याच्या तक्रारी आहेत. नागरिक कचरा जमवून गाडीची वाट पाहात असतात. मात्र गाडीच न आल्यास किंवा वेळेवर न आल्यास हा कचरा घरात न ठेवता इतरत्र फेकण्याचे प्रमाण वाढत आहे.
काही गाडय़ांचा मागील भाग खराब झाला असून पत्रा खराब असून गाडी जात नाही. खराडे कॉलनी, मुजावर कॉलनी, सुमंगल नगर भागात दोन दोन दिवस गाडी जात नाही. त्यामुळे लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गाडय़ांचा मेंटेनन्स संबंधित ठेकेदाराने करायचा आहे. मात्र वेळेवर मेंटेनन्स होत नसल्याने गाडय़ा नादुरूस्त राहात आहेत. यापूर्वी घंटागाडय़ांचे चालक व कर्मचाऱयांनी पगारावरून संप केला होता. त्यावेळी सकाळी शहरात एकही गाडी फिरकली नव्हती. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. घंटागाडी आली नाही किंवा उशिर झाला तर लोक नगरसेवकांना फोन करतात. नगरसेवक ठेकेदाराला फोन करतात. मात्र काही वेळा ठेकेदाराकडून नगरसेवकांनाच योग्य प्रतिसाद मिळत नाही, असे काही नगरसेवकांनी सांगितले.
पालिकेने कचरा संकलनाचा ठेका बदलण्यापूर्वी संकलन व्यवस्थित व विनातक्रार सुरू होते. मात्र ठेकेदार बदलल्यानंतर घंटागाडय़ांच्या वेळापत्रकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक शहरात कोठेही कचरा दिसत नाही, याचे कारण घंटागाडय़ांमधून होणारे कचरा संकलन हे आहे. नागरिकांनाही त्याची सवय लागली आहे. मात्र हे नियोजन विस्कळीत झाले तर शहरात जागोजागी पुन्हा कचरा दिसण्याची शक्यता आहे.
गत सभेत उपस्थित झाला होता मुद्दा
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी गतवेळच्या सर्वसाधारण सभेत घंटागाडय़ांच्या मेंटेनन्सचा विषय उपस्थित केला होता. चार वर्षांनंतर गाडय़ांची कामे निघत असून यात पालिकेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. तसेच संबंधित ठेकेदारासही वेळापत्रक विस्कळीत होऊ नये, यासाठी सूचना देण्याची मागणी होत आहे.