पालिकेच्या बांधकाम ठेकेदारांनी केली 510 मजुरांची सोय, दानशुरांकडूनही गोरगरिबांना मदत
प्रतिनिधी/ कराड
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी नगरपालिका तसेच दानशूर लोकांनी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले. यातून सुमारे 3 हजार लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे गोरगरीब मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडील ठेकेदारांना त्यांच्याकडे असणाऱया मजुरांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. याकामी नगरअभियंता ए. आर. पवार यांना माहिती संकलित करण्याची जबाबदारी दिली होती. पवार यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, सेन्ट्रींग कामगार व मंजूर असे 510 जण शहरात ठेकेदारांकडे कामास होते. हे सर्वजण परराज्यातील असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ठेकेदारांनी आपल्या मजुरांच्या अन्नपाण्याची सोय करणे बंधनकारक असल्याने पालिकेने ठेकेदारांना सूचना केल्या. त्यानुसार ठेकेदारांनी त्यांच्याकडे असणाऱया मजुरांना महिनाभर पुरेल इतके अन्नाचे किट देऊन त्यांची सोय केली आहे. पेडाई संस्थेच्या वतीने सुमारे कराड परिसरातील 700 कामगारांना अन्नधान्याचे किट दिले आहे.
याशिवाय हातावरचे पोट असणाऱया व गरीब कुटुंबांचे हाल होऊ नयेत, यासाठी दानशुरांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास मोठा प्रतिसाद मिळाला. समता सामाजिक संस्थेतर्फे 25 जणांना अन्नधान्याचे किट व रोज 70 ते 80 जणांच्या एकवेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. अख्तर आंबेकरी यांनी 220 लोकांना 20 दिवस पुरेल इतके धान्य दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे 50 जणांना धान्याचे किट देण्यात आले आहे. शिवराज ढाब्याचे पोपट साळुंखे, नामदेव थोरात यांनी आतापर्यंत 500 लोकांना ढाब्यातर्फे तयार जेवण दिले आहे. राजस्थानी जैन संघाने 550 लोकांना धान्य किट व रूग्णालयास 100 कोरंटाईन किट दिले आहेत. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी शहरातील 1 हजार लोकांना अन्नधान्याचे किट दिले असून आणखी 1 हजार कुटुंबाना किट देण्यात येणार आहे. राहत संस्था व इरफान सय्यद यांच्याकडूनही गोरगरीब लोकांना अन्नधान्याची सोय करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे घरी अडकून पडलेल्या गोरगरीब लोकांचे पोटापाण्यासाठी स्थलांतर होण्याची शक्यता होती. मात्र नगरपालिकेसह दानशूर लोक व संस्थांच्या मदतीमुळे त्यांचे स्थलांतर रोखण्यास मदत झाली आहे. याशिवाय मदतीचा ओघ कायम आहे. पोलीस यंत्रणा व महसूल यंत्रणाही आघाडीवर आहे. शहरात तीन ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. 5 रूपयांत मिळणाऱया या थाळीनेही गोरगरिबांची सोय केली आहे.