प्रतिनिधी/ कराड
लॉकडाऊनमुळे मार्चपासून बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने शहरात शाळा व महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. हे वर्ग सुरू करताना शासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांची कोविडची तपासणीही करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील वर्ग खोल्या निर्जंतुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वर्ग खोल्या, शौचालये, कार्यालये निर्जंतुक करण्यात येत आहेत. टिळक हायस्कूल, शिवाजी विद्यालय, विठामाता विद्यालय, यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल यासह अन्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग व परिसर सॅनिटाईज करण्यात आला.