सरिता घारे/कोयना वसाहत :
कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहेत. खेडेगावांतून मात्र रुग्णांची मार्गदर्शनाअभवी हेळसांड होत आहे. काही त्रास झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना टेस्ट केली जाते. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र त्या रुग्णांच्या घरातील सर्वांचीच बेडसाठी होणारी धडपड आणि बेड न मिळाल्याने होणारा मानसिक त्रास वाढत आहे.
जिल्हाधिकाऱयांनी होम आयसोलेशनचा पर्याय सांगितला आहे. त्यानुसार बाधित रुग्णांची तपासणी किंवा त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण कोणी बघायचे? ठराविक आरोग्य कर्मचाऱयांवरच हा सर्व ताण असतो. त्या आरोग्य कर्मचाऱयांना प्रशिक्षण किंवा सुरक्षा साधने आहेत का? तपासणी करून बाधित आल्यावर बेडअभावी माणूस घरात मरत आहे, तर मग नागरिकांनी तपासण्या करायच्या कशासाठी? उपचाराअभावी घरात मरण्यासाठी का, मृत्यूनंतर अठरा-अठरा तास अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्यासाठी, असा सवाल केला जात आहे.
1077 ला फोन
पॉझिटिव्ह रुग्णाने बेडची चौकशी करण्यासाठी 1077 या नंबरला फोन करायचा आणि माहिती घ्या असे सांगण्यात आले आहे. घारेवाडी येथील आज 50 वर्षांच्या व्यक्तीसाठी बेडची चौकशी या नंबरवर केली असता एक रुग्णालयाचे नाव सांगण्यात आले. नातेवाईकांनी सदर रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता त्यांना प्रत्यक्षात काहीही माहिती मिळाली नाही.
आरोग्य यंत्रणेवर ताण…
आरोग्य यंत्रणेवर ताण आहे, हे खरे असले तरी कराड तालुक्यातील एक सेंट्रलाईज सिस्टीम होती, ती संपूर्ण ढासळल्याचे दिसून येत आहे. नातेवाईकांची रुग्णाचा मृतदेह पाहून होणारी अवस्था याला जबाबदार कोण? ठराविक निर्णय घेऊन मृत्यू झाल्यानंतर लगोलग अंत्यसंस्काराची सोय करणे शक्य आहे. मृत्यू झाल्याचे समजताच त्या ठिकाणी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो अंत्यसंस्कारापूर्वी उपजिल्हा रुग्णालयासारख्या ठिकाणी का ठेवला जात नाही. असे केले तर निदान मृत्यूनंतर देहाची हेळसांड आणि नातेवाईकांची फरफट तरी थांबेल, असे मत व्यक्त होत आहे.
डिस्चार्ज आणि बाधित गुणोत्तर चुकतंय
रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण हे डिस्चार्ज च्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने गुणोत्तर चुकत आहे. हे जरी खरे असले, तरी किती रुग्णालयात किती रुग्ण आहेत, किती हॉस्पिटलमधून किती रुग्ण घरी सोडण्यात येणार आणि बाधित रुग्णांपैकी किती जणांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, या सर्वांची एकत्रित माहिती कोणीही देऊ शकत नाही. या सर्वांचे गुणोत्तर योग्य नियोजनाने केले गेले तर कदाचित तालुक्यातील काही प्राण नक्की वाचतील.
घारेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईक रुग्णाला बेड मिळावा यासाठी प्रयत्न करू लागले. कराड तालुका प्रांताधिकाऱयांना फोनवर संपर्क केला असता त्यांनी कराडमधील दोन रुग्णालयातील एकूण 37 डिस्चार्ज आहेत. संबंधित हॉस्पिटलमध्ये नातेवाईक जाऊन यातील ओ टू बेड किती शिल्लक आहेत, ते बघा असे सांगितले. संबंधित दवाखान्यातून योग्य ती माहिती नातेवाईकांना दिली नाही. तुम्ही वरिष्ठ डॉक्टरांना जाऊन भेटा असे सांगण्यात आले. संबंधित वरिष्ठ डॉक्टरांना फोनवर संपर्क केला असता जरी डिस्चार्ज असतील तरी आधीचे रुग्ण वेटिंगला आहेत. त्यामुळे बेड शिल्लक नाही, असे सांगण्यात आले.
कराड तालुक्यातील नागरिक बेवारस झालाय का?
कराड म्हणजे नक्कीच मुंबई नाही. धारावीतील परिस्थिती कंट्रोल होऊ शकते, मग कराड इतकं किचकट आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य टीव्हीवरील बातम्या बघणारा माणूस विचारत आहे.