वार्ताहर/ कराड
शुक्रवारी गणरायाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा घाटावर गर्दी होऊ नये तसेच मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन मूर्ती संकलन करण्यात येत आहेत. तर कृष्णा घाटावर दोन बोटी तैनात केल्या असून पालिका प्रशासनाच्या वतीने मूर्ती बोटीतून नेऊन थेट प्रीतिसंगमात विसर्जीत करण्यात येत आहेत.
शुक्रवारी घरोघरी व सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पा विराजमान झाल्याने सर्वत्र आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारनंतर शहरातील दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावर्षीही कोरोनाचे संकट असल्याने विसर्जनादरम्यान कृष्णा घाटावर गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. ज्या नागरिकांना गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणे शक्य नाही, अशा नागरिकांच्या घरी जाऊन पालिकेच्या वतीने मूर्ती संकलन करण्यात येत आहेत. यासाठी सहा ट्रक्टर व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ट्रक्टरच्या माध्यमातून संकलित केलेल्या मूर्ती कृष्णा घाटावर आणल्यानंतर बोटीच्या माध्यमातून मूर्ती प्रीतिसंगमात विसर्जित करण्यात येत आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी शहरात ठिकठिकाणी जलकुंड बांधण्यात येतात. मात्र यावर्षी पालिकेने लोखंडी तयार जलकुंड आणले आहेत. हे जलकुंड 14 ठिकाणी ठेवले आहेत. याशिवाय दोन शेततळी तयार केली आहेत. शनिवारी दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन असल्याने पालिका व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कृष्णा घाटाकडे जाणाऱया रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून केवळ पायी जाणाऱया नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे.