प्रतिनिधी/ कराड
भाजपचे नेते किरीट सोमय्या रविवारी रात्री मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावरून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले, तशी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. गणेश विसर्जनाचा ताण रात्री संपता संपता मध्यरात्रीपासून किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱयाचे नाटय़ रंगू लागले होते. पहाटे साडे चारच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस कराड रेल्वेस्थानकावर आली. सोमय्या रेल्वेतून उतरले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना शासकीय विश्रामगृहावर आणले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी ते मुंबईला रवाना झाले. सुमारे सहा तास हाय होल्टेज ड्रामा कराडमध्ये रंगला. त्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक झाली.
विसर्जन मिरवणुकीतही पोलीस अधिकाऱयांची फोनाफोनी
किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले असताना पोलीस यंत्रणेचे टेन्शन वाढत होते. गणेश विसर्जन अंतिम टप्प्यात आले असताना कोल्हापूर, सातारा, सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱयांत सोमय्या आल्यानंतर काय स्थिती निर्माण होईल, त्यांना कसे थांबवायचे याची फोनाफोनी सुरू होती. सोमय्या कोल्हापुरात पोहोचल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मध्यरात्रीपासून पोलीस दलात खलबते सुरू होती.
पहाटे साडे तीनला साताऱयात सोमय्यांची अधिकाऱयांनी घेतली भेट
पहाटे तीनला महालक्ष्मी एक्सप्रेस साताऱयात दाखल झाली. त्यावेळी कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे व एलसीबीचे प्रमोद जाधव यांनी सोमय्यांची भेट घेतली. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसबाबत कल्पना दिली. त्यांच्याशी चर्चा करत संभाव्य परिस्थितीची कल्पना दिली. पत्रकारांशी बातचित केली. त्यानंतर रेल्वे कराडला आली. अधिकारीही त्यांच्यासोबत आले.
कराड रेल्वेस्थानकात पहाटे साडेचारला तणाव
पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर सोमय्या यांनी कराड रेल्वे स्थानकावर उतरण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सोमय्या उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना गराडा घातला. त्यांना ताब्यात घेण्यात आले. या गराडय़ातूनच ते स्थानकाबाहेर आले. तेथून हा गाडय़ांचा ताफा शासकीय विश्रामगृहावर आला. तोपर्यंत विश्रामगृहाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शाहू चौकातून विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. विश्रामगृहात कोणालाही सोडले जात नव्हते. पहाटेपासून तैनात झालेला हा बंदोबस्त पाहून शहरवासिय अचंबित झाले होते.
नऊ वाजता आरोपांच्या फैरी
विश्रामगृहावरही सोमय्या यांची पोलीस अधिकाऱयांबरोबर चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी 9 वाजता माध्यम प्रतिनिधींशी बोलणार असल्याचे सांगितले. त्याबाबतचे निरोप पहाटे सहाला दैनिकांना देण्यात आले. तोपर्यंत माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी विश्रामगृहावर झाली होती. सकाळी नऊ वाजता सोमय्या पत्रकारांसमोर आले. त्यांच्यासोबत भरत पाटील आणि विक्रम पावसकर होते. पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळय़ांचे आरोप केले. घोटाळे झालेल्या ठिकठिकाणी पुन्हा भेटी देणार असल्याचे जाहीर केले.
प्रश्नांना उत्तरे देताना कधी संतप्त, कधी शांत
पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी आपले निवेदन प्रारंभी केल्यानंतर पत्रकारांनीही त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कोल्हापूर दौरा अर्धवट सोडण्यासह पवार, ठाकरेंच्या घोटाळय़ांबाबत पुरावे व इतर उलटसुलट प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यांना उत्तरे देताना सोमय्या कधी संतप्त होत होते. तर कधी शांतपणे पुढच्या प्रश्नांकडे वळत होते. प्रश्नोत्तरे संपण्यापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
10 वाजून 10 मिनिटांनी मुंबईला प्रयाण
पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सोमय्या पुन्हा प्रेश झाले. तोपर्यंत बाहेर वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनातून 10 वाजून 10 मिनिटांनी ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत विक्रम पावसकर, भरत पाटील हेही गेले. सोमय्या निघून जाताच पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षण रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, आनंदराव खोबरे, एलसीबीचे किशोर धुमाळ, रमेश गर्जे आदी अधिकारी उपस्थित होते.
विसर्जन बंदोबस्तानंतर पोलीस यंत्रणा सोमय्या बंदोबस्तात
कराडचे गणेश विसर्जन हे पोल्नीस यंत्रणेसाठी आव्हानात्मक असते. सकाळी 7 पासू रात्री बारापर्यंत शहरात सुमारे 300 पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. रात्री दहानंतर बंदोबस्त कमी झाला असला तरी शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत अधिकारी कृष्णा घाटावर तैनात होते. तोपर्यंत सोमय्यांना सातारा जिल्हय़ात रोखण्याची रणनीती तयार होत होती. त्यामुळे अधिकाऱयांना रात्री डोळाच लागला नव्हता. पहाटेपासून पुन्हा अधिकारी रेल्वे स्थानकावर तैनात झाले. उरलेला बंदोबस्त विश्रामगृहावर लागला होता.