वार्ताहर/ कराड
‘हात दाखवा गाडी थांबवा’ हे ब्रीद वाक्य असलेली कराड आगारची एसटीच आता ग्रामीण भागात दिसायची बंद झाल्याने प्रवाशांना नाईलाजाने वडापला हात दाखवण्याची वेळ येत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच गावातील एसटी सेवा अद्याप बंद असल्याने प्रवाशांना जादा पैसे देऊन वडापने प्रवास करावा लागत आहे. निव्वळ इंजिन ऑईल नसल्याने जवळपास 10 बसेस लॉकडाऊन संपल्यापासून बंद आहेत, तर अन्य काही बसेस नादुरूस्त आहेत. त्यामुळे केवळ इमारत चकाचक असलेल्या कराड आगाराचा कारभार मात्र भोंगळ असल्याचे प्रवाशांतून बोलले जात आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून कोटय़वधी रुपयांचा निधी खर्चून कराडला सुसज्ज व आकर्षक नवीन बसस्थानक उभारण्यात आले. वास्तविक नवीन बसस्थानक झाल्यानंतर प्रवाशांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांच्या अडचणीत अधिकच वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व क्षेत्रांबरोबरच राज्यभरातील एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने एसटी सेवा सुरू करण्यात आली. सध्या जवळपास लॉकडाऊन संपल्यात जमा आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. अशावेळी रेल्वेसेवाही सुरळीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कराड आगार मात्र अद्याप लॉकडाऊनमधून बाहेर यायच्या मानसिकतेत दिसत नाही.
कराड तालुक्यातील एसटीच्या सर्वाधिक फेऱया काले-मसूर-काले या मार्गावर होत होत्या. दिवसभर 7 बसेसच्या माध्यमातून साधारण 49 फेऱया या मार्गावर होत होत्या. काले, कालेटेक, शिवाजीनगर, मुनावळे, पाचवड फाटा, नांदलापूर, जखिणवाडी, मलकापूर, कृष्णा हॉस्पिटल, कराड बसस्थानक, विद्यानगर, कोपर्डे, सहय़ाद्रि साखर कारखाना, शहापूर फाटा व मसूर या मार्गावर चालणारी एसटी कराड आगाराला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळवून देत होती. सध्या मात्र या मार्गावर दिवसातून केवळ दोन फेऱया होत आहेत.
याबरोबरच कार्वे, धानाई, दुशेरे आदी मार्गावर दररोज 14 फेऱया होत होत्या. सध्या केवळ एक ते दोन फेऱया सुरू आहेत. कार्वे धानाई सेवा पूर्णपणे बंद आहे. खोडशी, वहागाव, घोणशी या मार्गावरही दिवसातून 8 ते 9 फेऱया होत होत्या. या फेऱयाही पूर्ण बंद आहेत. रेठरे कारखाना, शिर्टे, पलूस या मार्गावरील फेऱयाही बंद आहेत. वडोली निळेश्वरला 12 फेऱया होत्या, तर किरपेला 8 ते 9 फेऱया होत्या. या दोन्ही मार्गावरील एसटी सेवा पूर्ण बंद आहे.
कराडसह पाटण तालुक्यातील अनेक गावांत कराड आगारातून एसटी सेवा सुरू होती. मात्र लॉकडाऊननंतर पुन्हा त्या गावांत एसटी सुरू झालेली नाही. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एसटी बंद असल्याचा फायदा वडाप चालकांनी उठवला आहे. वडापचालकांनी सर्वच मार्गावर दुप्पट दर केले, असून प्रवाशांची लूट सुरू आहे. सध्या शाळा-महाविद्यालये पूर्वरत सुरू होत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील एसटी सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
वरिष्ठांनी कारभाराची चौकशी करावी…
कराड आगारात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची एसटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी चौकशी करणे गरजेचे आहे. कराड आगार बंद पडण्याची वेळ आली तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. कोकण व घाटमाथ्याला जोडणारे कराड हे मुख्य आगार आहे. त्यामुळे याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एकीकडी एसटी तोटय़ात आहे म्हणायचे आणि दुसरीकडे उत्पन्नाच्या मार्गावरील फेऱया बंद ठेवायच्या, असे चित्र सध्या दिसत आहे.