पुण्यात ठेव विमा कार्पोरेशनबरोबरच्या बैठकीत निर्णय, अवसायक मनोहर माळी यांची माहिती
कराड / प्रतिनिधी :
कराड जनता बँकेची दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर 5 लाखाच्या आतील ठेवीदारांची रक्कम करण्यासाठी सहकार विभाग आणि ठेव विमा आणि पतहमी कार्पोरेशनच्या अधिकाऱयांबरोबर बँकेचे अवसायक मनोहर माळी यांची महत्वपूर्ण बैठक पुण्यात झाली. या बैठकीत ठेव परत करण्याबाबत चर्चा होऊन अगोदर सर्व ठेवीदारांची केवायसी घेण्यात यावी, असा निर्णय झाला. त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
बँकेचे सुमारे 1 लाख 99 हजार 761 ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी 516 कोटी 35 लाख इतक्या रकमेच्या आहेत. यातील 1 लाख 99 हजार 163 ठेवीदार 5 लाखाच्या आतील असून त्याची रक्कम 431 कोटी 62 लाख 95 हजार इतकी आहे. या ठेवींना 5 लाखाचे विमा संरक्षण गतवर्षापासून मिळाले आहे. आता बँक दिवाळखोरीत निघाली असून रिझर्व्ह बँकेने 99 टक्के लोकांचे 5 लाखांच्या आतील पैसे परत करण्याची हमी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अवसायक मनोहर माळी व बँकेच्या अधिकाऱयांची गुरूवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीस ऍडिशनल रजिस्टार तुंगार व ठेव विमा कार्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठेवी परत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
बँकेचे 31 मार्च 2020 अखेरचे ऑडीट कोविडमुळे झालेले नाही. ते तातडीने पूर्ण करावे. त्यानंतर बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या 8 डिसेंबर 2020 तारखेपर्यंतचे ऑडीट पूर्ण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ठेवींच्या परताव्यांसाठी क्लेम कसे करायचे, याबाबत माहिती देण्यात आली. बँकेने ऑडीट पूर्ण केल्यानंतर ठेव हमी कार्पोरेशनकडून ऑडीट होणार आहे. या प्रक्रियेस सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व ठेवीदारांची केवायसी व इतर माहिती बँकेने घ्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत, असे बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी ‘तरुण भारत’ ला सांगितले.