पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण; 9 वर्षांनी चव्हाण पालिकेत
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संसर्ग वाढत असताना कराड नगरपालिकेच्या ताफ्यात दुसरी रूग्णवाहिका बुधवारी दाखल झाली. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून रुग्णवाहिकेसाठी निधी देण्यात आला होता. पालिकेच्या आवारात चव्हाण यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यानिमित्ताने सुमारे नऊ वर्षांनी चव्हाण पालिकेत आले. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची पालिका भेट राजकीय वर्तुळात औत्सुक्याचा विषय ठरली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक विकास निधीतून कोविड सेंटर व कराड पालिकेला रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. मात्र गेले काही महिने ही रूग्णवाहिका पालिकेत दाखल झाली नव्हती. चव्हाण यांनी एका आढावा बैठकीत पालिकेला फटकारले होते. दोन दिवसापूर्वी चव्हाण समर्थक नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव यांनी मुख्यधिकाऱयांची भेट घेऊन रुग्णवाहिका तातडीने आणण्यासंदर्भात कार्यवाही केली. त्याबाबतचा पाठपुरावा झाल्यानंतर पालिकेच्या आवारात काल नवीन रुग्णवाहिका दाखल झाली. आ. चव्हाण यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम आज घेण्यात आला. त्यासाठी आ. चव्हाण आज पालिकेत आले होते. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक पावस्कर, विद्या पावसकर, शारदा जाधव सुहास जगताप, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, अतुल शिंदे, इंद्रजीत गुजर, फारुख पटवेकर, सुरेश पाटील, महेश कांबळे, विनोद भोसले, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगर अभियंता एन. एस. पवार, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, इंद्रजित चव्हाण, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, जितेंद्र ओसवाल, जावेद शेख, सिद्धार्थ थोरावडे, रमेश वायदंडे, ललित राजापुरे आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील तसेच राजेंद्रसिंह यादव यांच्यासह यादव समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते. पालिकेने गतवर्षी जनरल फंडातून 1 रूग्णवाहिका व 1 शववाहिका खरेदी केली होती. आता यात आणखी एका रूग्णवाहिकेची भर पडली आहे.
यावेळी आ. चव्हाण म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या लढाईत प्रत्येक नागरिकाने लॉकडाऊन मध्ये सहभागी व्हावे. राज्य शासनाने आज रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यास प्रतिसाद द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांच्या मदतीचा हात सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागून कोरोनावर मात करावी.