वार्ताहर/ कराड
येथील शासकीय विमानतळाला महावितरणच्या दुर्लक्षाचे ग्रहण लागले आहे. शुक्रवारी दुपारपासून विमानतळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून हा परिसर अंधारात आहे. विमानतळ प्रशासन वारंवार येथील वीज खंडित पुरवठय़ाच्या तक्रारी महावितरणकडे करत असले, तरी महावितरणकडून तातडीने पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे.
कराड विमानतळ हे शासकीय असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून त्याची देखभाल केली जाते. विमानतळाच्या रन वेसह परिसरात मोठे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचा उपयोग विमाने उतरण्यासाठी व उड्डाणासाठी होत असतो. मात्र गेल्या काही महिन्यात येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने महावितरणकडे दुरुस्तीची मागणी वेळोवेळी केली आहे. मात्र महावितरणकडून विमानतळाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असून, तातडीने कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.
काल दुपारी या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर तो शनिवारीही सुरळीत झालेला नव्हता. याबाबत विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला. येथील विमानतळ हे महत्त्वाचे असून येथे शासकीय विमाने तसेच व्हीआयपी व्यक्तींची विमाने उतरत असतात. अशा परिस्थितीत येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, त्यात बिघाड होणे हे योग्य नाही. याबाबत विमानतळ प्रशासनाने महावितरणशी पत्रव्यवहारही केला असल्याचे समजते केला असल्याचे सांगण्यात आले. मात्र विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाकडे महावितरणकडून केल्या जाणाऱया दुर्लक्षामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या विमानतळावर शासकीय विमाने, महनीय व्यक्तींची विमाने उतरतात. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित होणे व त्याची दुरुस्ती तातडीने न होणे हे गंभीर आहे.