पायरी घाट येथील मोरी खचल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक
प्रतिनिधी / वैभववाडी:
गेले तीन दिवस संततधार कोसळणाऱया पावसामुळे करुळ घाटातील पायरी घाटदरम्यान घाटमार्ग खचला आहे. रस्त्याच्या बाजूपट्टीपर्यंतचा भाग पूर्णतः दरीत गेला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक झाला असून 26 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा नेहमीप्रमाणे करुळ घाटमार्गाला फटका बसला आहे. सततच्या पावसाने करुळ घाटातील पायरीचा घाट येथे मोरी खचली आहे. त्यामुळे घाटमार्गाला भगदाड पडले आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडल्यानंतर करुळ तपासणी नाक्यावरून वाहन चालकांना घाट खचल्याची माहिती देण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालकांना सबुरीने वाहन चालविण्याच्या सूचना केल्या. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस नाईक गणेश भोवड घटनास्थळी उपस्थित होते.
दरीकडील बाजूला असलेल्या मोरीच्या ठिकाणी रस्ता खचला आहे. मार्गाच्या साईडपट्टीचा भागही दरीत कोसळला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी रस्त्याचा काही भाग धोकादायक स्थितीत असून तोही भाग कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाटमार्ग 15 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. घाट खचल्याची माहिती वाहन चालकांना करुळ चेक नाक्यावरील पोलीस व गगनबावडा पोलीस देत आहेत. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरल व रिफ्लेक्टर बसविले आहेत.
पूर्वी कोल्हापूर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता हाच मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला आहे. पावसाळा व हिवाळय़ात घाटमार्गात दाट धुके असते. सध्या पाऊस व धुके असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र प्राधिकरणकडून या घाटमार्गाबाबत दुर्लक्ष होत आहेत. दरम्यान, खचलेल्या घाटमार्गाची प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी पाहणी करून अधिकाऱयांना सूचना दिल्या.